फुरसुंगी -उरुळी देवाची-बाह्यवळण मार्गालगतच्या जुन्या पालखी मार्गाची खिंडीजवळ मोठी दुरवस्था झाली आहे. या मार्गात सर्वत्र दगडगोटे व खड्डेच खड्डे पडल्याने हा मार्ग उजाड माळरानासारखा झाला आहे. या मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. फुरसुंगी आणि उरूळीदेवाची स्वतंत्र नगरपालिका निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून या रस्त्याच्या रखडलेल्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
उरुळी देवाची गाव ते बाह्यवळण मार्गे आदर्शनगर, जेएसपीएम शैक्षणिक संकुलाकडे जाणाऱ्या जुन्या पालखी मार्गावर मोठी लोकवस्ती आहे. आदर्श नगर परीसरात सुमारे 15 हजार नागरीक राहतात तर उरुळीदेवाची, वडकी, मंतरवाडी, फुरसुंगी, हांडेवाडी, होळकरवाडी आदी भागातील हजारो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. बाह्यवळण मार्गावरुन शाळेकडे जाणारा हा मार्ग तीव्र उतारावर प्रचंड खराब झाला आहे.
या मार्गावर तीव्र उतार असल्याने आदर्शनगरकडूर येताना खराब रस्त्यामुळे वाहनांवर नियंत्रित ठेवणे कठीण जात असल्याने वाहने थेट बाह्यवळण मार्गावर येत असल्याने हांडेवाडीच्याबाजुने बाह्यवळण मार्गावरुन सुसाट वेगाने वाहने धावत असल्याने भीषण अपघातचा धोका आहे. हा मार्ग उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक वाहने बंद पडून वाहतुकीचा खोळंबा होत आहे. भीषण अपघातानंतरच पालिका प्रशासनाचे डोळे उघडतील काय? असा प्रश्न नागरिकांकडून केला आहे.
“त्या’ मार्गाकडेही दुर्लक्षच…
हडपसर-सासवड या पालखी मार्गाच्या रुंदीकरण तसेच दुरूस्तीकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सदर मार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतरच या मार्गाकडे मोठ्या प्रमाणात प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. मागील 10 ते 12 वर्षांपासून या मार्गाचे काम रेंगाळले आहे.