मुंबई – घाऊक किमतीवर आधारित महागाई 14.55 टक्क्यावर गेली आहे. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्ध रेंगाळल्यामुळे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी जोरदार विक्री होऊन शेअर निर्देशांक दोन टक्क्यापर्यंत कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,172 अंकांनी म्हणजे 2.01 टक्क्यांनी कोसळून 57,166 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 302 अंकांनी कोसळून 17,173 अंकांवर बंद झाला. इन्फोसिस एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. या तीन कंपन्याबरोबरच टेक महिंद्रा, टिसीएस या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मात्र अशा परिस्थितीतही एनटीपीसी, टाटा स्टील, मारुती, टायटन, नेस्ले, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरची काही प्रमाणात खरेदी झाली.
गेल्याच आठवड्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर सात टक्क्यांच्या जवळ गेल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदार अस्वस्थ झाले होते. आज घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर वाढून 14.55 टक्क्यांवर गेल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली. रशिया -युक्रेन युद्ध सुरू होऊन आता दोन महिने होत आले आहेत. मात्र हे युद्ध मिटण्याची कसलीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर आणखी वाढले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जागतिक पातळीवर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात विक्री झाल्याचे दिसून आले.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री –
दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच असून बुधवारी या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 2,061 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. अमेरिका आगामी काळात व्याजदर वाढ करणार असल्यामुळे गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत आहेत.