नवी दिल्ली – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिषचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर कॉंग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळातून मिश्रा यांना केव्हा हटवणार, असा सवालही पक्षाने केला.
कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून सरकारला लक्ष्य केले. शेतकऱ्यांचा विश्वासघात भाजप केव्हा थांबवणार, असा प्रश्न सुर्जेवाला यांनी विचारला. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील पीडित शेतकरी परिवार न्यायासाठी संघर्षपूर्ण लढा देत आहेत. सत्तेच्या संरक्षणात त्यांच्यावर अतिशय क्रूर स्वरूपाचा अन्याय आणि अत्याचार झाला.
न्यायासाठीच्या लढाईत शेतकऱ्यांच्या पीडित परिवारांसमवेत उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. मग, ती लढाई कितीही प्रदीर्घ असो, असे प्रियंका यांनी म्हटले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कॉंग्रेस पुन्हा मिश्रा यांच्या विरोधात आक्रमक होणार असल्याचे सूचित होत आहे. आशिषचा जामीन रद्द झाल्याने मोदी सरकार आणि भाजपला घेरण्याची संधी विरोधकांना उपलब्ध झाली आहे.