मुंबई – अमेरिकेने डिसेंबरपर्यंत व्याजदरात 0.75% ची कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक शेअर बाजाराबरोबर भारतीय शेअर बाजारातही गुरुवारी चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्याचबरोबर युरोप आणि आशिया खंडातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 539 अंकांनी उसळून 72,641 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 172 अंकांनी म्हणजे 0.79 टक्क्यांनी वाढून 22,011 अंकावर बंद झाला.
एनटीपीसी, पावर ग्रिड, इंडसइंड बँक, टाटा स्टील, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा या कंपन्यानी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. मात्र एअरटेल, मारुती, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात घट झाली.
जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील सकारात्मक संदेशामुळे भारतीय शेअर बाजारांना दिशा मिळू शकली. सध्याची परिस्थिती परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय शेअर बाजार निदेॅशांक काही प्रमाणात वाढतील असे त्यांनी सुचित केले.
छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त आहेत असे समजले जात असले तरी आजही मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात जास्त वाढ झाली. त्यामुळे मिडकॅप 2.36 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 2.01 टक्क्यांनी वाढले.
ऊर्जा, रीअॅल्टी भांडवली वस्तू, धातू, सेवा आणि ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक वाढले, एकूणच शेअर बाजारात आज चैतन्याचे वातावरण होते असे दिसून आले. जागतिक पातळीवर व्याजदर कमी होणार असल्यामुळे जागतिक व्यापाराला चालना मिळू शकते. अशा परिस्थितीत भारताची निर्यात वाढण्याची शक्यताही खुली झाली असल्याचे सांगण्यात आले.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी भारतीय शेअर बाजारात 2,599 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र लवकरच हे गुंतवणूकदार भारतात परत खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअरमधील खरेदी कमी करून भारतीय कर्जरोख्यातील खरेदी वाढविली आहे. आता शेअर मधील खरेदीही वाढली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.