मुंबई: गेल्या दोन महिन्यात शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांना खरेदीसाठी सध्याचा काळ संधी वाटत आहे. त्यातच रिझर्व बॅंक आणि केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी बऱ्याच उपाय योजना लागू केल्या आहेत. आगामी काळातही ही प्रक्रिया चालू राहणार आहे याचा अंदाज गुंतवणूकदारांना आल्यामुळे शेअर बाजारात खरेदी वाढून निर्देशांक उंचावले जाता आहेत. गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात चार टक्क्यांची वाढ झाली.
गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स चार टक्क्यांनी म्हणजे 1,265 अंकांनी वाढून 31,159 वर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 4 टक्क्यांनी म्हणजे 363 अंकांनी वाढून 9,111 अंकावर बंद झाला.
ह्या आठवड्यात केवळ तीन दिवस शेअर बाजाराचे काम काज झाले. सहा एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त शेअर बाजाराचे कामकाज बंद होते. तर शुक्रवारी 10 एप्रिल रोजी गुड फ्रायडे मुळे शेअर बाजाराचे कामकाज बंद राहणार आहे.
आज झालेल्या खरेदीचा वित्तीय सेवा, वाहन आणि औषधी कंपन्यांना फायदा झाला. सध्याच्या लॉक डाऊनच्या काळातही भारतातील औषधी उद्योगाने उत्तम कामगिरी केली आहे. देशांतर्गत गरजेबरोबरच औषध उद्योग मोठ्या प्रमाणात निर्यात करीत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात झालेल्या पडझडीचा जास्त फटका औषधी उद्योगाला बसलेला नाही.
जागतिक बाजारातील निर्देशांकही आज कमी-अधिक प्रमाणात वाढल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांना आधार मिळाला असे विश्लेषकांनी सांगितले. करोनाव्हायरस मुळे विकसित देशांची परिस्थिती जास्त बिघडली आहे. त्या तुलनेत भारताने योग्य वेळी कडक उपाययोजना केल्यामुळे भारताची कमी हानी झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतातील उद्योग-व्यवसाय अधिक वेगाने पुनरुज्जीवित होतील असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते. मात्र परिस्थिती अधिक बिघडल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे.