राजुरी, (वार्ताहर) – पिंपळगाव जोगा धरणाच्या डाव्या कालव्यास झाडाझुडापांचा विळखा वाढत चालला आहे, त्यामुळे कालव्याला तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
जुन्नरच्या पूर्व भागातील बेल्हे, राजुरी, आळे, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, खामुंडी, ओतूर, रानमळा आदी गावांना या कालव्याच्या पाण्याने एक संजीवनीच मिळाली आहे.
तर पुढे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काही गावांना या कालव्याच्या पाण्याचा मोठा फायदा होत आहे. अशा या कालव्याच्या दोन्ही बाजूंनी अगदी कालव्याच्या अस्तरिकरणास मोठंमोठी बाभळीची झाडे झाली आहेत.
तसेच काही ठिकाणी कालव्यामध्ये उंच वाढलेली झाड दिसत आहेत. तर काही ठिकाणी खुरट्या वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी कालव्यामध्ये इतर कचरा, घाण, शेतातील काढलेले गवत, दगड गोट्यासह इतरही घाण कालव्यामध्ये टाकली जाते, त्यामुळे कालव्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाला आहे.
या झाडांच्या मुळांनी अनेक ठिकाणी अस्तरीकरणास भेगा पडलेल्या आहेत. भविष्यात याच झाडाझुडपंच्या मुळांनी कालव्याला तडे जाऊन फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कुकडी पाटबंधारे विभागाने यावर त्वरित कार्यवाही करून स्वच्छता करावी जेणेकरून भविष्यात कालव्याचे होणारे नुकसान टाळले जाईल, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पूर्व भागास वरदान पण…
या जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागास वरदान ठरलेल्या या कालव्याला वडगाव आनंद, आळे, बेल्हे, राजुरी, रानमळा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत.त्याचप्रमाणे पाण्यात मोठयाप्रमाणात कचरा असल्याने पुढे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.