जामखेड – छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज देखील बहुजन समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी लढले. तोच वारसा आपण पुढे नेत आहोत. केंव्हाही धनगर समाजाच्या आंदोलनात बोलवा, तत्काळ उपस्थित होईल. कारण मराठा आरक्षणाच्या लढ्याबरोबरच धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी आम्ही आपल्याबरोबर आहोत, असे मत खा. संभाजीराजे यांनी चौंडी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंती महोत्सव आज चौंडी या जन्मस्थळी साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार गणपत देशमुख होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, डॉ. खा. विकास महात्मे, आ. मोनिका राजळे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ. शिवाजी कर्डिले, आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, रामहरी रुपनवर, आ. रामराव वडकुते, आ. नारायण पाटील, दत्तात्रय भरणे, अनिल गोटे, माजी आ. बबनराव पाचपुते, पोपट गावडे, ना. धों. महानोर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, नानाभाऊ कोकरे, विजय मोरे, अनंत कुमार पाटीलसह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात आपण सर्व नेते संभाजी महाराजांना विसरलात यांची खंत वाटते. बहुजन समाजाचा अर्थ सर्व समाज असा होतो. यामध्ये मराठादेखील आहे, हे विसरू नये. आज खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समजून घेणे महत्त्वाचे आहे.
ना. मुंडे यांनी सरकारने धनगर आरक्षणाबाबत योग्य अहवाल न्यायालयात दाखल केला आहे. त्यामुळे धनगर आरक्षण हे मिळणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
धनगर समाजाला अदिवासींच्या सवलती दिल्या आहेत. धनगर आणि धनगड एकच आहे, तसा अहवाल टाटा इंस्टिट्यूटने दिला आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी काळे झेंडे न दाखवता पिवळे झेंडे घेऊन चालायचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महाराष्ट्रात चारशे कोटी रुपयांची सभागृह उभारणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.