नवी दिल्ली – श्रीलंकेमध्ये महागाई नियंत्रणाबाहेर गेल्याने तेथील जनतेने सत्ताधाऱ्यांविरोधात उग्र आंदोलने केली. श्रीलंकेत सध्या अराजक माजले असून सत्ताधारी पक्षाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच श्रीलंकेत महागाईचा भडका उडाल्याने आंदोलने पेटलेली असतानाच विरोधी पक्षातील काही नेत्यांनी महागाईला वेळीच अटकाव न केल्यास भारतात देखील अशी परिस्थिती उद्भवू शकते अशी भीती व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी श्रीलंका व भारताची तीन मुद्द्यांवरून तुलना करत दोन्ही देशांमधील साम्य अधोरेखित केले आहे. सोबतच, ‘जनतेची दिशाभूल केल्याने सत्य परिस्थिती बदलत नाही. भारतातील परिस्थिती श्रीलंकेसारखीच दिसते.’ असा संदेश लिहला आहे.
काय आहे राहुल गांधींची फेसबुक पोस्ट?
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टद्वारे एक चार्ट पोस्ट केला आहे. या चार्टमध्ये बेरोजगारी, इंधन दरवाढ व धार्मिक हिंसाचार या तीन मुद्द्यांवरून भारत व श्रीलंकेत तुलना करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलेल्या या ग्राफमध्ये दोन्ही देशांमध्ये २०१७ नंतर बेरोजगारी, इंधन दरवाढ व धार्मिक हिंसाचार यामध्ये वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, लंकेमध्ये २०२० लोकसभा निवडणुकांमध्ये महिंद राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील एसएलपीपीचे सरकार पुन्हा एकदा बहुमतासह सत्तेत आले. मात्र वाढत्या महागाईविरोधात जनतेने उग्र आंदोलने केल्याने महिंद राजपक्षे यांना पंतप्रधानपद सोडावे लागले.
Distracting people won’t change the facts. India looks a lot like Sri Lanka. pic.twitter.com/q1dptUyZvM
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 18, 2022