श्रीनगर – काश्मीर मधील एका सरकारी सेवकाची दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून हत्या करण्याचा प्रकार घडल्यानंतर काश्मीर पंडितांमध्ये पुन्हा संताप आणि भीतीची लाट पसरली असून त्यांची तेथील निदर्शने सुरूच आहेत. आज त्यांच्यावतीने राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना एक निवेदन पाठवण्यात आले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील काश्मीरी पंडितांना अन्यत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करावी अन्यथा येथील सरकारी सेवेत असलेले सर्व काश्मीरी पंडित सामुहिक राजीनामा देतील असा इशारा त्यांनी दिला आहे.
काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसन पॅकेज अंतर्गत अनेकांना सरकारी सेवेत नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत आणि हे कर्मचारी आपल्या कुटुंबासह काश्मीर खोऱ्यात राहात आहेत. राहुल भट नावाच्या महसुल खात्यात सेवेत असलेल्या एका कर्मचाऱ्याची काल दहशतवाद्यांनी हत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर तेथील या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काश्मीर ही आमच्यासाठी आजही सुरक्षित भूमी नाही असे त्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे. आम्ही जगात कोठेही काम करण्यास तयार आहोत पण आमची आजही काश्मीर खोऱ्यात राहण्याची इच्छा नाही. आमच्या लोकांच्या रोज होणाऱ्या हत्या आमच्यासाठी भयावह आहेत असेही त्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.