जळगाव | एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एसटी कामगारांना आपण आजूबाजूच्या राज्यांपेक्षा अधिकची पगारवाढ दिली आहे. तसेच आता राज्यातील शाळा, कॉलेज, परिक्षा सुरु झाल्या आहेत. सर्वसामान्यांना एसटीचा मोठा आधार असतो. या परिस्थितीत एसटी कर्मचारी हट्टाला पेटले आहेत, हे बरोबर नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रवासी नागरिकही आपलेच आहेत आणि एसटी कामगार देखील आपलेच आहेत. माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की, आता कामावर येऊन तुम्ही एसटी सुरू केली पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अनिल परब यांनी आतापर्यंत अनेकदा कामगारांना मूभा दिली. पण आता मात्र त्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये. एसटी कर्मचाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. आता कामावर येऊन सुरुवात केली पाहिजे. एसटी चालवताना काही कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली जाते. एसटीचे नुकसान झाले तर ते जनतेचच नुकसान आहे. त्यातून कोण काय मिळवतं?, असा सवाल अजितदादा पवार यांनी उपस्थित केला आहे.
उद्या मेस्मा कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेऊन तुटेपर्यंत ताणले तर मागच्या काळामध्ये काय अवस्था झाली हे आपण बघितले. जर कुणी ऐकायला तयार नसेल आणि नवीन भरती सुरू केली तर नोकरीचा प्रश्न येणार आहे. याबद्दल पण मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. इथपर्यंत टोकाची वेळ येऊ नये अशी विनंती अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे मानधन बऱ्यापैकी वाढवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना पगार कमी होता पण मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी संमजसपणे भूमिका घ्यावी. आपण महाराष्ट्रातील एका परिवारातील आहोत,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.