मुंबई : तब्बल 5 महिन्यांच्या ब्रेकनंतर आजपासून लालपरी म्हणजेच एसटी बस पुन्हा एकदा धावणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टिमेटम आज संपला असून आजपासून एसटीचे 77 हजारांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर उर्वरित साडेचार हजार कर्मचारी चाचण्या पूर्ण करून उद्या कामावर रूजू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी जवळपास दीडशे दिवस संप पुकारणारे कर्मचारी आजपासून कामावर रूजू होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून म्हणजेच ऐन दिवाळीत एसटी कामगारांनी संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. मर आजपासून सुरु होणाऱ्या एसटीमुळे दुर्गम भागात राहणारे नागरिक, विद्यार्थी यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं एसटी कामगारांना कामावर हजर होण्याची दिली होती. ही मुदत आज शुक्रवार, 22 एप्रिल रोजी संपत आहे. आज गुरुवारी 21 एप्रिल रोजी 2,992 नवीन एसटी कर्मचारी कामावर दाखल झाले आहेत. आता हजेरीपटावरील 81,683 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 4,721 कर्मचारीच उरले असून ते उद्यापर्यंत सेवेत दाखल होतील, अशी माहिती मिळत आहे.
सध्या दररोज सरासरी सात हजार बसेसच्या आधारे 25 हजार फेऱ्या चालवीत त्याद्वारे 17 लाख प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोनापूर्व काळात एसटीमधून दररोज 65 लाख प्रवाशांची वाहतूक केली जात होती, तर दिवसाला 22 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळत होते.