मुंबई- एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी 11 सप्टेंबरला ही संपाची हाक दिली आहे.
हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत करारातील तरतुदीनुसार सरकारने 42% महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
यासह, दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा. एसटीची धाववेळ (रनिंग टाईम) निश्चित करावी. तसेच वाहकांचे (कंडक्टर) बदली धोरण रद्द करावे, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा, लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी 240 हजर दिवसांची अट रद्द करावी यासह अनेक मागण्या, एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.