मंचर, (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी मंचर तालुका आंबेगाव येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे आंबेगाव तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. उपोषणाला भेट देत विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
मंचर तालुका आंबेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंबेगाव तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी स्वतः अन्नत्याग उपोषण रविवार, दि. १८ रोजी सुरू करून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला आहे. या उपोषणाला बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, किसान सभेचे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर, राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले,विकास जाधव, हेमंत एरंडे, गणेश खानदेशे, भरत मोरे इत्यादी मान्यवरांनी उपोषणस्थळी सोमवार, दि. १९ रोजी भेट देत पाठिंबा दर्शवून राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र शब्दात निषेध केला.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी सरकारला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना दिवसा वीज नाही, आपल्या भागातील बिबट्यांचे वाढते हल्ले, अवकाळी पावसामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही, कांद्यावर सरकारने लादलेली निर्यात बंदी, पीकविमा कधीच मिळत नाही,कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही,
जलसंपदा विभागाकडून वसूल केली जाणारी वाढीव पाणीपट्टी अशा विविध समस्यांनी हैराण झालेल्या बळीराजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुत्रांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. वरील मागण्याची पूर्तता सरकारने लवकरात लवकर करावी. अन्यथा उपोषणाचा लढा तीव्र केला जाईल. असा इशारा उपोषण करते दत्ता गांजाळे यांनी दिला.