करोनाबाधितांच्या संख्येत एकाएकी वाढ झाल्यासे सावध
कोलंबो : श्रीलंकेतील करोनाबाधितांच्या संख्येत एकाएकी वाढ झाल्याने तो देश सावध झाला आहे. त्यातून श्रीलंकेने देशव्यापी संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय मागे घेतला. करोनाचा फैलावाने जगभरात कहर केला आहे. त्या विषाणूने श्रीलंकेतही शिरकाव केला आहे. मात्र, त्या देशातील करोनाचे संकट इतर देशांच्या तुलनेत अद्याप तरी किरकोळ स्वरूपाचेच आहे.
श्रीलंकेत 11 मार्चला पहिला करोनाबाधित आढळला. त्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी श्रीलंकेत 20 मार्चपासून देशव्यापी संचारबंदी लागू करण्यात आली. आता महिनाभराचा कालावधी उलटल्यावर त्या देशातील करोनाबाधितांची संख्या 250 च्या घरातच राहिली. त्यामुळे आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी तेथील सरकारने सोमवारपासून (20 एप्रिल) संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या देशात मागील 24 तासांत 41 नवे करोनाबाधित आढळले.
रूग्णांमध्ये अचानक एवढी वाढ झाल्याने श्रीलंका सरकारने सावधगिरीची भूमिका घेतली. त्यातून संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्याशिवाय, संचारबंदीची मुदत 27 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान, श्रीलंकेतील करोनाबाधितांची संख्या 295 इतकी आहे. त्या देशात करोनाने 7 रूग्णांचा बळी घेतला आहे. तर, 96 रूग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.