नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सहकार्याने देशात गुणवत्ता शोधमोहीम राबवणार, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले आहे. या गुणवत्तेतूनच पुढील दोन ऑलिम्पिक स्पर्धांमधील पदक विजेते घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढील वर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे, त्यासाठी जे खेळाडू पात्र ठरले आहेत त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे. मात्र, त्याचबरोबर केवळ त्याच स्पर्धेवर नव्हे तर त्यानंतरच्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांवर लक्ष केंद्रित करत पदकविजेते घडविण्यासाठी येत्या काळात देशात गुणवत्ता शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. 2028 साली अमेरिकेत होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकतालिकेत पहिल्या दहा देशांत स्थान मिळवले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी संघटनेच्या सहकार्याने भविष्यातील इंडिया मटेरियलचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही रिजीजू यांनी सांगितले आहे.
या मोहिमेत 10 व 12 वर्षांखालील खेळाडूंचा समावेश जास्त संख्येने करण्यात येणार आहे. लहान वयातच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तरच त्यांना यश मिळेल. सध्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजना सुरू आहे त्यालाच ही मोहीम जोड म्हणून यशस्वी ठरेल.
शाळा, महाविद्यालये, विविध क्लब तसेच खेडोपाड्यातील स्थानिक क्रीडा स्पर्धंमध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू हेरून त्यांच्या चाचण्या घेतल्या जातील व त्यातून शॉर्टलिस्ट करून या मोहिमेत सहभागी करून घेतले जाईल. त्यांना अव्वल प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनही मिळेल. याच प्रयत्नांतून देशाला पदक विजेते खेळाडू निश्चितच गवसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.