धनंजय एकबोटे
(दरबार भरला आहे. महाराज नेहमीप्रमाणेच अस्वस्थ आहेत. प्रधानजी नेहमीसारखी विचारपूस करतात. मात्र, महाराज डोळे वटारून प्रधानजींना “नको’ असे खुणावतात.)
“काय खबरबात प्रधानजी?’ कारभारावर जनता खूश व समाधानी आहे ना?’
“महाराज, सर्वजण घरात सुरक्षित आहेत.’
“का? लोक बाहेर फिरत नाही?
“महाराज, बाहेर करोना विषाणू फिरतो आहे मोकाट’.
“हरकत नाही, कुणीतरी फिरतयं ना? हेही नसे थोडके.’
“काय बोलताय महाराज? लोक काय म्हणतील?’
“प्रधानजी, ऑफ द रेकॉर्ड आहे हे, वाटल्यास डिलीट करा बरं’.
“ओके महाराज. एक बातमी आहे, दिल थाम कर बैठीये.’
“काय म्हणता? बोला’.
“महाराज, अब आया है उंट पहाड के नीचे.’
“सविस्तर सांगा, असे कोड्यात बोलाल तर टकमक टोकावरून कडेलोट करेल.’
“महाराज, अभय! राजस्थानातील सरकार अस्थिर करण्यात ते यशस्वी ठरले नाहीत.’
“ते कोण प्रधानजी? पुन्हा कोड्यात बोललात, टकमक टोक विसरलात?’
“आपले पूर्वाश्रमीचे मित्र, महाराज.’
“ओह. काय हे? नुसता विस्तारवाद शिरला आहे त्यांच्या डोक्यात.’
“महाराज, आता पुढे काय?’
“ते त्यांचे बघून घेतील, आपण लुडबूड करू नये प्रधानजी.’
“महाराज, जंगलाला आग लागली की आपण केवळ मूकदर्शक बनून चालत नाही.’
“सविस्तर समजावून सांगा प्रधानजी…’
“महाराज, शेजारच्या घराला आग लागली तर दरवाजे बंद करून चालत नाही. पाण्याची बादली घेऊन जायला हवे आग विझवायला अन्यथा आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागत नाही बरं.’
“अस्स!’ महाराज विचारात पडतात. प्रधानजी पण अस्वस्थ होतात.
“प्रधानजी, आपण एक प्रयोग करूया. सर्व मित्रांना बोलवा. आपण सर्वजण गडाच्या टेरेसवर जमायचे आहे.’
“का महाराज?’
“सांगतो तसा निरोप द्या. येताना प्रत्येकाने घंटा, थाळी, चमचे, मेणबत्ती, टॉर्च घेऊन या म्हणा.’
“सांगतो महाराज, पण का?’
“प्रधानजी गच्चीवर जाऊन प्रत्येकाने घंटानाद, थाळीनाद करायचा, मोबाइलचा टॉर्च लावायचा.’
“त्याने काय होईल महाराज?’
“सरकार अस्थिर करणारा व्हायरस पळून जाईल व पाच वर्षे आपला राज्यकारभार सुरळीत चालू राहील. कशी आयडिया आहे प्रधानजी.’
“वा… महाराज वा… आपण धन्य आहात.’
“या तर मग… तखलिया.’
(महाराज दरबार संपल्याची घोषणा करतात व शयनगृहाकडे प्रस्थान करतात.)