पुणे, {विजयकुमार कुलकर्णी} – नागरिकांना नेहमीच विदेशी वस्तूंचे आकर्षण राहिले आहे. अगदी आहारातही विदेशी पदार्थ दिसू लागले आहेत. त्याचबरोबर भारतीयांना विदेशी फळांचीही गोडी लागली असून, या फळांसाठी मागणी वाढू लागली आहे. मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात विदेशी फळे दाखल होत आहेत. रंग, दर्जा, चव आणि टिकाऊपणामुळे ही फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र बाजारात आहे.
बाजारात इतर फळांच्या तुलनेत जवळपास ३० ते ४० टक्के विदेशी फळांची आवक होते. देशातील फळांचा हंगाम संपल्यानंतर परदेशातून फळांची आवक होते. त्यामुळे वर्षभर हंगाम नसला, तरी बहुतांश फळे फळबाजारात दिसून येतात. परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात शीतगृहांची व्यवस्था असल्याने ही फळे चांगल्या स्वरूपात आणि वेळेवर बाजारात दाखल होतात.
सर्वाधिक आयात होणाऱ्या फळांमध्ये सफरचंदाचा सर्वांत वरचा क्रमांक लागतो. हवाई, तसेच जलमार्गाद्वारे ही फळे भारतात येतात. हाताळण्यास नाजूक असलेली चेरी, ऍप्रिकोट, जर्दाळू, ब्लू बेरी, रासबेरी आदी फळे विमानाने पाठविली जातात, तर इतर सर्व फळे जहाजातून मुंबई व चेन्नई पोर्टवर पाठविली जातात. या ठिकाणाहून ही सर्व फळे देशाच्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात.
सुरुवातीच्या काळात या फळांना विशेष मागणी होत नव्हती. मात्र, रंग, दर्जा, चव आणि टिकाऊपणामुळे याच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये या फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. आहार जागरूकतेमुळे वजन कमी करणे असो किंवा वाढविणे, फलाहाराला विशेष प्राधान्य दिल्याने फळांना मागणी अधिक आहे.
आयात होणारी बहुतांश फळे महाग असल्याने मोठमोठे मॉल, रेस्टॉरंटमधून ही फळे मागवली जातात. अलीकडच्या काळात स्थानिक बाजारातही परदेशी फळे दिसू लागली आहेत. किरकोळ बाजारातही सर्व परदेशी फळे दोनशे ते पाचशे रुपये किलोच्या घरात मिळतात. मात्र, किवी, ड्रॅगनसारखे फळ नगावर मिळते.
देशनिहाय आयात होणारी फळे
फळे देश
सफरचंद : चिली, साऊथ आफ्रिका, इटली, स्पेन, बेलझियम, इराण, तुर्की, अमेरिका, न्यूझीलंड, पोलंड, तुर्कस्थान, अर्जेंटिना.
पिअर : बेल्जिअम, अमेरिका, दक्षिण आफ्रिका.
मोठी द्राक्षे : चिली, अमेरिका, चायना.
किवी : इराण, न्यूझीलंड, इटली, गिरीस, चिली.
प्लम : इजिप्त, इटली, स्पेन, चिली.
ड्रॅगन : व्हिएतनाम
ऑरेंज : इजिप्त, दक्षिण आफ्रिका.
रेड चेरी – चिली, आस्ट्रोलीया, इराण, अमेरिका.
गेल्या काही वर्षांत विदेशी फळांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. देशातील फळांचा हंगाम संपल्यानंतर ही फळे बाजारात दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. याउलट फळांच्या आयातीमुळे सर्व प्रकारची फळे ग्राहकांसाठी बाराही महिने उपलब्ध झाली आहेत. – सलीम मस्तानसाब बागवान परदेशी फळांचे व्यापारी, मार्केट यार्ड.
परदेशी फळांना वेगळी चव आहे. ती नागरिकांना आवडू लागली आहे. त्यामुळे चांगली मागणी असल्याने आयातदार या फळांची आयात करतात. हंगाम असो किंवा नसो, ही फळे उपलब्ध असतात. अलीकडच्या काळात या फळांची उलाढाल वाढली आहे. – बाळासाहेब कोंडे फळ आणि भाजीपाला विभागप्रमुख, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.