– श्रीनिवास वारुंजीकर
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका लवकरच खेळवली जाणार असून, त्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. वर्ष 1996 पासून उभय देशांमधील चषकाला ऍलन बॉर्डर आणि सुनील गावसकर या महान खेळाडूंच्या कामगिरीवरुन बॉर्डर-गावसकर चषक असे संबोधले जाते. तेव्हापासून आज अखेर या दोन देशांमध्ये जोरदार चकमक उडण्याचे आणि सामने रंगतदार होण्याचे प्रसंग आले.
तेंडुलकर-वॉर्न युद्ध (चेन्नई – 1998)
भारत-ऑस्ट्रेलिया लढत म्हटली की प्रथम आठवते ती गोष्ट म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मॅजिक स्पिनर शेन वॉर्न यांच्यातले युद्ध. चेन्नईच्या एम. चिदम्बरम स्टेडियममध्ये वर्ष 1998 मध्ये पहिल्या डावात वॉर्नने त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत तेंडुलकरला चार धावांवर स्लिपमध्ये झेलबाद केले. मग भारताची मधली फळी कापून काढत, ऑस्ट्रेलियाने भारताला 257 धावांवर रोखले. नंतर इयान हिलीच्या 90 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 328 धावा करत 71 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मात्र, सचिनने वॉर्नसह सर्वच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत 191 चेंडूंत 155 धावांचा धडाका मारला. त्यानंतर भारताने आपला डाव 4 बाद 418 वर घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 348 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, कुंबळे-राजू-चौहानच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 168 धावांत आटोपला आणि भारताने हा सामना 179 धावांनी जिंकला. अर्थातच मॅन ऑफ द मॅच होता तेंडुलकर.
लक्ष्मण-द्रविडचे राज्य (कोलकता – 2001)
वर्ष 2001 च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत भेटीतील दुसरी कसोटी कोलकताच्या ईडन गार्डनवर झाली. क्रिकेटच्या इतिहासात फार कमी असे संघर्षमय विजय असतील, ज्यात फॉलो-ऑन मिळालेल्या संघाने अंतिमत: विजय मिळवला असेल. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात स्टीव्ह वॉच्या 110 आणि मॅथ्यु हेडनच्या 97 धावांच्या जोरावर 445 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यासमोर भारताला पहिल्या डावात 171 धावाच करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाला 274 धावांची आघाडी मिळाली. पुन्हा फलंदाजीला पाचारण केल्यानंतरही भारताची अवस्था 3 बाद 115 झाली होती आणि तिसरी विकेट होती सचिन तेंडुलकरची. मग राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने खेळाची सूत्रे हातात घेतली आणि संपूर्ण दिवसभर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळू न देता या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 376 धावांची भागिदारी केली. त्यामध्ये लक्ष्मणच्या 281 आणि राहुलच्या 180 धावांचा समावेश होता. भारताने 7 बाद 657 धावांवर आपला डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे आव्हान दिले. हरभजनसिंगच्या हॅटट्रिकसह त्याने घेतलेल्या सहा विकेट्सच्या (पहिल्या डावात 7) बळावर ऑस्ट्रेलियाला 212 धावा करता आल्या आणि भारताने हा सामना 171 धावांनी जिंकला. मॅन ऑफ द मॅच ठरला – लक्ष्मण.
पॉण्टींगचा धुमाकूळ (ऍडिलेड – 2003)
वर्ष 2003 भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुसरी कसोटी ऍडिलेड येथे झाली. यामध्ये कर्णधार रिकी पॉण्टींगने धडाकेबाज 242 धावा करुन भारतीय गोलंदाजांना धडकी भरवली. जस्टीन लॅंगरच्या 58 आणि सायमन कॅटीचच्या 75 धावांसह ऑस्ट्रेलियाने 556 धावांचा डोंगर उभारला. पुन्हा एकदा द्रविड-लक्ष्मणची जोडी भारताच्या मदतीला धावून आली. द्रविडने 443 चेंडूंत 233 धावा ओतल्या तर लक्ष्मणने 148 धावा करत भारताला 523 पर्यंत पोहोचवले. मग अजित आगरकरने ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडत 41 धावांत 6 विकेट्स घेत, ऑस्ट्रेलियाला 196 धावांत रोखले. मग 230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा द्रविडनेच 72 धावा ठोकत भारताला 4 विकेट्सनी विजय मिळवून दिला.
मंकीगेट स्कॅण्डल (सिडनी – 2008)
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटना म्हणता येऊ शकेल, अशी वाईट आठवण वर्ष 2008 च्या सिडनी कसोटीबाबतची आहे. हा सामना 122 धावांनी जिंकत, ऑस्ट्रेलियाने सलग 16 कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला. वेस्ट इंडीजमधील मूलवंशीय असलेल्या अष्टपैलू ऍण्ड्रयु सायमण्डसचा उल्लेख भारतीय फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने “मंकी’ असा केल्याने सायमण्डसने वर्णद्वेषी टिपणी केल्याचा आरोप करत दाद मागितली. मग हरभजनसिंगला शिक्षा म्हणून तीन क्सोटींची बंदी घालण्यात आली. ही बंदी न उठवल्यास भारताने मालिका अर्ध्यावर सोडण्याची धमकी दिली. मग बरीच भवती न भवती झाल्यावर वातावरण निवळले आणि क्रिकेटमधील सभ्यतेचा विजय झाला.
फिरकीची जादू (बेंगळुरू – 2017)
मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने बेंगळुरू कसोटीतही विजयाच्या तयारीने मैदानावर पाऊल ठेवले. फिरकीपटू नाथन लिऑनने 50 धावांत 8 विकेट्स घेत भारतीय गोटात भीती पसरवली. भारताच्या 189 धावांत फक्त के. एल. राहूलच्या 90 धावा उल्लेखनीय ठरल्या. मग “तेरा जादू चल गया…’ रविन्द्र जाडेजाने 63 धावांत 6 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाला 276 धावांवर रोखले. मॅट रेन्शॉच्या 60 आणि शॉन मार्शच्या 66 धावांमुळे पाहुण्यांना 83 धावांची आघाडी मिळाली. भारताने पुजाराच्या 92 धावांच्या बळावर भारताने 274 धावा केल्या. दुसऱ्या डावात पाहुण्यांना रविचंद्रन आश्विनने बघता बघता गुंडाळले. आश्विनने 41 धावांत 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला 112 धावांतच रोखले. भारताने हा सामना 75 धावांनी जिंकला. एकूण स्पिनर्सनी या सामन्यात बाजी मारली.