संगमनेर -मराठा समाजात अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण असून त्यांच्या आरक्षणाला इतर समाजाचाही पाठिंबा आहे. या आरक्षणासाठी सरकारने लवकरात लवकर लक्ष घातले पाहिजे. यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी आग्रही मागणी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाविषयी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षण मिळावे, ही जनभावना आहेत.
मराठा समाजात अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण आहे. या समाजातील तरुणांचा रोजगारीचा प्रश्न वाढला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या माध्यमातून रोजगार मिळेल, अशी अपेक्षा तरुणांना असणे सहाजिक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला इतर समाजाचाही पाठिंबा आहे. त्यामुळे सगळ्या भावनांचा विचार करून सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे.
याबाबत विशेष अधिवेशन बोलून आरक्षणाबाबत ज्या काही पूर्तता करायचे असतील त्या पूर्ण करून लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत बोलताना थोरात म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी एका सभेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गुरू म्हटले होते. मग गुरूवर टीका कशी काय करू शकतात? खा.शरद पवार यांचे कृषी क्षेत्रातील आणि शेतकऱ्यांसाठी खूप योगदान दिलेलं आहे. काहीही टीका केली तरी त्यांचे देशाच्या राजकारणात व समाजकारणात आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठे योगदान आहे, हे सर्वांना माहित असल्याचा टोला लगावला. निळवंडेचे उद्घाटन कोणी केले हा प्रश्न येत नसून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याने आपल्या कामाचे सार्थक झाल्याचे धरण व कालव्यांचे निर्माते आ. बाळासाहेब थोरात म्हणाले.