आळंदी (एम.डी.पाखरे /ज्ञानेश्वर फड) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. मंगळवार (दि. 5) पासून सोहळ्याला सुरुवात होणार आहे. शनिवार (दि. 9) रोजी कार्तिकी एकादशी तर सोमवारी (दि.11) संजीवन समाधी दिन आहे. तत्पूर्वी आज वरिष्ठ अधिकार्यांनी मंदिर परिसर, दर्शनबारी, इंद्रायणी परिसराची पाहणी केली. यावेळी पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर, विश्वस्त योगी निरंजननाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी आहे. वारकरी संप्रदायात आळंदी कार्तिकी यात्रेचे विशेष महत्व आहे. त्यामुळे हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक येत असतात. यावर्षी 7-8 लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामस्थ यांच्या तयारीला वेग आला आहे.
भाविकांना तात्काळ मदतीसाठी 112, 100 क्रमांक
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर व आळंदी शहर तसेच परिसरात सुमारे 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून याकॅमेर्यांव्दारे संपूर्ण यात्रेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या मदतीकरिता आळंदी शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलीस मदत केंद्र उभारले आहे. दिंडयांचे ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग नेमणेत येणार आहे. पथारीवाले , हातगाडीवाले, फेरीवाले, हॉकर्स यांनी रस्त्यावर तसेच फुटपाथवर न बसता आळंदी नगरपरिषदेने ठरवुन दिलेल्या ठिकाणीच दुकाने लावावीत. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
भाविकांना काही अडचण अथवा समस्या आल्यास तात्काळ उपाययोजना म्हणुन नजीकचे पोलीस मदत केंद्र किंवा 112, 100 नंबर वर कळवावे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय भाविकांचे सेवेशी कायम तत्पर व सतर्क आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.
असा असेल पोलिसांचा बंदोबस्त
सहाय्यक पोलीस आयुक्त -6,
पोलीस निरीक्षक-34
पोलीस उपनिरीक्षक- 147,
पोलीस अंमलदार 855
वाहतूक पोलीस अंमलदार-280,
होमगार्ड – 950
एसआरपीएफ च्या 2 कंपन्या,
एनडीआरएफ च्या 1 तुकडी,
बीडीडीएस चे 2 पथके
यात्रेकारुंच्या सेवेसाठी नगरपरिषदेची तयारी
20 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा
24 तास स्वच्छतेसाठी कर्मचारी तैनात
400 तात्पुरते शौचालय
120 सीसीटीव्ही
आपत्ती व्यवस्थापनासाठी 3 अग्निशमन दल गाड्या, इंद्रायणीत 3 रेस्क्यू बोटी
इंद्रायणी नदी घाटावर महिलांसाठी चेंजींग रूम्स
आवश्यक ठिकाणी सूचना फलक
भाविकांना इंद्रायणी स्नाणासाठी मिळणार शुद्ध पाणी
यात्रा काळात भाविकांना इंद्रायणी स्वच्छता पाण्यात अंघोळ करता यावी यासाठी आंध्र धरणातून 100 क्यूसेक व वडिवे धरणातून 150 क्यूसेक असा एकूण 250 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सोमवारपर्यंत इंद्रायणी पात्रात मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी राहील.
वारी कालावधीत 24 तास वीज, पाणीपुरवठा केला जाणार आहे. स्वच्छतेसाठी 3 शिफ्टमध्ये काम चालणार आहे. देखभाल दुरुस्तीची कामे झाली आहेत. मदत केंद्र, वॉच टॉवर उभारणी काम पूर्णत्वास येत असून भाविक वारकर्यांच्या सेवेसाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे.