टाकवे बुद्रुक – पावसाळा संपला अन हिवाळ्याची सुरवात झाली. रेनकोट, छत्र्या कपाट, ट्रंक अन गाठोड्यात गेले आणि उबदार कपडे बाहेर आले. मात्र, गेल्या काही दिवसांतील वातावरणाने पुन्हा उबदार कपडे ठेवून रेनकोट काढण्याची वेळ आणली. यापूर्वी १९९६ मध्ये नोव्हेंबरमध्ये पावसाने असेच झोडपले होते, त्याची २७ वर्षांनी पुनरावृत्ती झाली.
खऱ्या अर्थाने थंडीची चाहूल लागते ती ऑक्टोबरची हीट संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून. मावळ तालुक्यातील डोंगर, जंगलात बसलेली थंडी हळूच गावामध्ये प्रवेश करते, असा ग्रामीण भागात हिवाळा सुरू होण्याविषयीचा ठोकताळा आहे. प्रादेशिक हवामान खात्याने नुकताच वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, अनेकांनी हवामान खात्याच्या अंदाजाला धुडकावले. मात्र मावळ तालुक्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्यापूर्वी थंडीची चाहूल लागल्याने अनेकांचे स्वेटर, मफलर, कानटोप्या सोबत नेल्या होत्या मात्र अचानक पाऊस आल्याने दुचाकी चालविणाऱ्यांना पावसात भिजत गारव्यामुळे थरथरत्या हाताने दुचाकी चालवत घर गाठण्याची वेळ आली. त्यामुळे कपाटात ठेवलेले रेनकोट बाहेर काढावे लागले. असेच ढगाळ वातावरण पुढील काही दिवस राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.
नोव्हेंबरमध्ये भारतभर १९–२० मिलिमीटर अवकाळी पाऊस होत असतो. मात्र, यावेळी याचे प्रमाण जास्त राहिले. यापूर्वी १९९६-९७ मध्ये नोव्हेंबरमध्ये असाच मोठा पाऊस झाला होता. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडून येणारे बाष्प यांची टक्कर होऊन अशी परिस्थिती निर्माण होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत साधारण अशी स्थिती असते, असे हवामानाचे अभ्यासक सांगत आहेत.