38 कोटींची तरतूद : सांडपाणी, मलनिःसारण प्रकल्प सुरू
राजगुरूनगर – राजगुरूनगर शहरासाठीच्या सांडपाणी, मलनिःसारण (भुयारी गटार) प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामुळे शहरात भुयारी गटारे होणार असल्याने राजगुरूनगर शहर अजूनच स्वच्छ आणि सुंदर बनणार आहे. या कामासाठी 38 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
राजगुरूनगर (ता. खेड) शहरासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तांत्रिक, प्रशासकीय मान्यता, निविदा, कार्यादेश इत्यादी सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या 29 कोटी रुपयांच्या कामांस मंजुरी असून, 12 कोटी 50 लाखांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध झाला आहे. प्रकल्पासाठी सरकार 90 टक्के निधी देणार असून, उर्वरित 10 टक्के रक्कम नगरपरिषदेने खर्च करावयाची आहे.
प्रकल्पाचे औपचारिक भूमिपूजन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले होते. या कामाची सुरुवात या महिन्यात सुरू झाली आहे. भुयारी गटार योजेनेच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नगरसेवक संपदा सांडभोर, रेखा क्षोत्रीय, संगीत गायकवाड, स्नेहलता गुंडाळ, राहुल आढारी, राजू जाधव, नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.
राजगुरूनगर शहरातील नागरिकांना लवकरच चास कमान धरणातून स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. योजनेचे काम पूर्णत्वाकडे आहे. शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. हे काम 18 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांची अडचण होणार आहे. त्यानंतर सर्वच रस्ते नूतनीकरण केले जाणार आहे.
– शिवाजी मांदळे, नगरसेवक, राजगुरूनगर