पणजी : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोवा राज्य कृषिप्रधान बनविण्यासाठी व गोवा राज्य सेंद्रीय शेतीचे देशातीएल एक महत्त्वाचे केंद्र बनविण्याची तयारी गोवा सरकारने सुरु केली आहे.
केंद्रीय कृषी खात्याचे कार्यालय व केंद्रीय कृषी खात्याच्या सचिवाकडे याबाबत चर्चा झाली असून गोवा सरकारचे कृषी खाते आणि केंदीय कृषी खाते यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प आकाराला येणार आहे.
यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि गोव्याचे कृषिमंत्री बाबू कवळेकर यांच्यात चर्चा सुरु आहे. गोव्याच्या ग्रामीण भागात शेतीचा व्यवसाय पूर्वापार चालत आला आहे. मध्यंतरी खाण व्यवसाय जोमात असल्याने शेतीकडे दुर्लक्ष झाले होते.
पण पर्यावरण खात्याच्या निर्बंधांमुळे आता खाण व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. आता शेती हा मोठा पर्याय लोकांसमोर आहे. त्यामुळे आता सरकार गोव्याला सेंदीय शेतीचे हब बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे.
गोवा सरकारचे कृषी खाते याबाबत गांभीर्याने विचार करीत असून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णपणे केंद्र सरकारच्या मदतीने उभारला जाणार आहे. राज्य सरकारवर याचा बोजा पडणार नाही.
कशाप्रकारे हा प्रकल्प राबवायचा याचा अभ्यास केलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे केंद्रिय कृषी सचिवांनी सांगितले आहे. सेंद्रीय शेतीचे हब बनल्यास गोव्याच्या कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडेल. शेतकऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल.
भारताबाहेरील विद्यार्थीही गोव्यात येतील. याबरोबरच कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. गोवा हे पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. किनारी भाग हा केवळ दहा टक्के आहे. पर्यटकांना अन्य क्षेत्राचीही आवड असते. त्यामुळे कृषिप्रधान राज्य म्हणून पुढे आल्यास पर्यटनालाही उभारी मिळेल, असे मानले जात आहे.