– वृषाली पंढरी
ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया वटसावित्री नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
“यत्र नार्यस्तु पूज्यंते रमते तत्र देवता’ हे संस्कृत वचन नारीची महानता सांगते. भारतात एक काळ असा स्त्री जातीचा आदर करणारा होता. मात्र, नंतर पत्नीला दुय्यम वागणुकीचा सामना करावा लागला आहे. पती मरण पावल्यास पत्नीला सती जावे लागे. सगळी बंधने, रीतिरिवाज केवळ पत्नीसाठीच, पतीसाठी का नाहीत? पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी, प्रगतीसाठी प्रार्थना करणारी करवा चौथ, हरितालिका, कोकिळाव्रत आणि वटसावित्री ही व्रते स्त्रियांनी करावयाची. हे सर्व पुरुषाच्या कल्याणासाठीची, विशेषतः पतीच्या कल्याणाची आहेत. जागतिक कन्या दिन, महिला दिन, मातृदिन अशा निमित्ताने स्त्रियांचे गौरव करण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे, हे चांगलेच आहे. मात्र, जागतिक पत्नी दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातोय, असे काही अजून पुढे आलेले नाही. पत्नी मृत झाल्यास तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ अविधवा नवमी हे पतीने पत्नीसाठी करावयाचे एकमेव व्रत समाजात आहे. पण तेही दुर्दैवाने मृत्यूनंतरचे आहे. पत्नीच्या जिवंतपणी पतीने करावे असे एखादे व्रत धर्ममार्तंडांनी जरूर सुरू करावे, असे सुचवावेसे वाटते.
एखादे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते असे सिद्ध करता आलेले नाही. पण गुड मॉर्निंग वा गुड नाइट म्हटल्याने सकाळ किंवा रात्र चांगली गेल्याचे तरी कुठे सिद्ध करता आले आहे? तरीही आपण अशा शुभेच्छा देतोच ना? कार्यसिद्धीस जाण्यासाठी, विघ्ने दूर होण्यासाठी प्रार्थना आजही जगभर केली जाते. तसेच वटसावित्री व्रत एका जिद्दी, आपल्या प्रेमावर विश्वास असलेल्या पत्नीची कहाणी म्हणून साजरी केली जात असेल तर त्यात गैर काय? त्यावर अंधश्रद्धा म्हणून टीका करण्यापेक्षा ज्या स्त्रियांना ते करायचे आहे ते एका जिद्दी व
स्वतःवर विश्वास असलेल्या शूर स्त्रीची कहाणी म्हणून करण्यास काही हरकत नसावी.हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया वटसावित्री नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची संकल्पना भारतीय संस्कृतीने जोपासली आहे. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही ही भावना यामागे आहे.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. ब्रह्मदेवही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या इतर देवता आहेत. या व्रताचा पूजाविधी असा आहे- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. हल्ली सर्वत्र बांधकामे सतत चालू असल्याने वाळू मिळणे सोपे झाले आहे. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्री व्रताचे महत्त्व सांगणारे “सावित्री’ नावाचे महाकाव्य लिहिले आहे.
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे. सर्व वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया “मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातवंडे यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात. ही प्रार्थना पुढीलप्रमाणे आहे-
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी।
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात।
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि
जन्मनि ।। वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।। या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.अतिप्राचीन काळी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. त्याकाळी मुलींना आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याच्या धर्मत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित हा राजा जंगलात राहात होता. त्रिकालज्ञानी नारद मुनींना सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नकोस, असा सल्ला सावित्रीला दिला होता.पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू-सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून आपण ज्याला आता वटपौर्णिमा म्हणतो ते वटसावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला भोवळ आली व तो जमिनीवर पडला. यम तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून व तिची जिद्द आणि पतीवरील प्रेम पाहून यमाने पतीचे प्राण सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. हुशार सावित्रीने सासू-सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले. शिवाय आपल्याला पुत्र व्हावा असा तिसरा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. जेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली तेव्हा सत्यवानाचे प्राण त्याला परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळविले. त्यादिवशी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा होती. म्हणून या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.