– डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक
“श्रद्धेवाचून भक्ती करणारे लोक यमदूतांना आवडतात. कोंबडे किंवा बकरे यांचा बळी देऊन नवस फेडणारे लोक देवाच्या दारात स्वार्थाचा बाजार मांडतात.’ नामदेव सगुण रूपातील विठ्ठलाचे श्रेष्ठ उपासक आहेत….
संत ज्ञानदेवांचे संतमंडळ फार मोठे आहे. त्यामध्ये संत नामदेवांचे नाव विशेष महत्त्वाचे आहे. भक्तराज पुंडलिकाने पंढरीला चंद्रभागा नदीच्या तीरावर वारकरी पंथाचे इवलेसे रोप लावले. नामदेवांनी आपल्या ऐंशी वर्षांचे “जीवन’ शिंपून ते रोप वाढविले. (काल इ.स. 1270 ते 1350) आपल्या अमृतमधुर अभंगवाणीने त्यांनी विठ्ठलाच्या नामभक्तीचा प्रसार केला. जनाबाई, चोखामेळा, परिसा भागवत असे समर्थ शिष्य तयार केले. त्यांचा कालखंड सातशे वर्षांपूर्वीचा आहे. त्या काळात धर्माला ग्लानी आली होती. धर्माचरणामुळे जीवन उजळून निघण्याऐवजी धर्माला भीतीपोटी केलेल्या उपासनेचे स्वरूप आले होते.
अडाणीपणा, दुबळेपण, भय यांमुळे तेव्हाचा समाज भांबावून गेला होता. अशा उपासनेचा नामदेवांनी निषेध केला आहे. ते सांगतात- “श्रद्धेवाचून भक्ती करणारे लोक यमदूतांना आवडतात. कोंबडे किंवा बकरे यांचा बळी देऊन नवस फेडणारे लोक देवाच्या दारात स्वार्थाचा बाजार मांडतात.’ नामदेव सगुण रूपातील विठ्ठलाचे श्रेष्ठ उपासक आहेत. श्रीविठ्ठल हा भक्तीला भुलतो. आपल्या भक्तावर तो प्रेमसुखाचा वर्षाव करतो. सर्वत्र विठ्ठल भरून राहिला आहे. आपली आई-वडील, भावंडे आणि अन्य आप्तजन यांना नामदेव विठ्ठलाच्या ठिकाणी पाहतात. विठ्ठल हा त्यांचा आनंदाचा ठेवा आहे. त्याच्या भक्ताला कशाचेही भय नसते, असे सांगून नामदेवांनी सामान्य माणसाचे आयुष्य आनंदमय केले. पंढरीचा आनंदसोहळा सगळ्या भक्तांना अनुभवता यावा, ही त्यांची इच्छा आहे. रूढीच्या दडपणाखाली अडाणी व गरीब लोकांची जीवने काळवंडली होती. त्या लोकांना त्यांनी विठ्ठलभक्तीच्या प्रकाशाचा मार्ग दाखवला.
“”नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।” अशी त्यांची प्रतिज्ञा होती. लहान-मोठा किंवा गरीब-श्रीमंत असी दृष्टी ठेवणे योग्य नाही, असा उपदेश त्यांनी केला. श्रीविठ्ठलाच्या सगुणरूपाची ओढ आणि त्याच्या नामभक्तीची उत्कट मनीषा हीच त्यांच्या अभंग-कवितेची प्राणशक्ती आहे. विठ्ठलाचे सुंदर रूप हा नामदेवांच्या कौतुकाचा विषय आहे. त्याच्या मुखावरून चंद्रबिंब ओवाळून टाकावे, असे त्यांना वाटते. जन्मभर विठ्ठलाच्या सहवासाचे सुख हेच नामदेवांचे ध्येय बनून जाते. संत ज्ञानदेव हे संत नामदेवांचे जिवलग मित्र होते. “”सखा विरळा ज्ञानेश्वर। नामयाचा जो जिव्हार।।” या शब्दांत संत जनाबाईंनी त्या दोघांच्या स्नेहसंबंधांचे वर्णन केले आहे.
ज्ञान आणि भक्ती यांचे आदर्श असलेले हे दोघे समकालीन संत तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रेदरम्यान ज्ञानदेव हे नामदेवांना भक्तीविषयी काही ना काही प्रश्न विचारून बोलते करीत होते. नामदेवांनी नम्रपणे दिलेली उत्तरे ऐकून ज्ञानदेवांना आनंद वाटत होता. “”पंढरीरायाचा तू प्रेमभंडारी” अशा शब्दांत ते नामदेवांचे कौतुक करतात. ज्ञानदेवांनी श्रीक्षेत्र आळंदी इथे कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 (इ. स. 1296) या दिवशी समाधी घेतली. त्या प्रसंगी नामदेव तिथे उपस्थित होते. ज्ञानदेवांविषयीचा आपल्या मनातील आदरभाव व्यक्त करताना नामदेव म्हणतात, “”नाथा नको रे अंतरू। तुझ्या कासेचे वासरू।।” त्यांचे मन उदास झाले. आता पंढरपूर कैसे कंठू, असा प्रश्न त्यांना पडला. पुन्हा ते तीर्थयात्रेला एकटे निघाले. महाराष्ट्राच्या सीमा त्यांनी पार केल्या.
भारतातील अनेक प्रदेशांतून फिरत फिरत नामदेव पंजाबात गेले. तिथल्या गुरुदासपूर जिल्ह्यात हिंडताना त्यांना एक निवांत जागा आवडली. त्या जागेचे रूप बदलले. तिथे “घुमान’ या नावाचे नवे गाव वसले. आजही घुमानला नामदेवांचे स्मृतिमंदिर आहे, त्यांचे भक्तजन आहेत. “नामदेव की घोमानी’ म्हणून हे गाव ओळखले जाते. “पंजाबमधील पंढरपूर’ असा या गावाचा महिमा आहे. प्रवेशद्वारावर संगमरवरी शिळा बसविलेली आहे. त्या शिळेवर “स्वामी नामदेव मंदिर’ असा देवनागरी लिपीत उल्लेख आहे. पंजाबी शीख मंडळी “गुरुद्वारा बाबा नामदेव’ असे त्या मंदिरास म्हणतात. पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यांतून नामदेवांनी भ्रमण केले होते.
तिथल्या लोकांना नामभक्तीचे महत्त्वपटवून दिले होते. त्यांच्या “गुरूग्रंथसाहिब’ या ग्रंथात सोळा संतकवींच्या पदरचनांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये नामदेव हे एकमेव मराठी संत आहेत. त्यांची एकसष्ट हिंदी पदरचना “बाबा नामदेवजी की मुखबानी’ म्हणून ओळखली जाते. अन्य राज्यांतूनही त्यांनी भ्रमण केले. तिथेही त्यांनी वारकरी पंथाच्या विठ्ठलभक्तीचा प्रभावी प्रचार-प्रसार केला. उत्तर प्रदेशातील शहापूर, महंमदपूर, देवमळ, पाकवडा, हरदोली, कपूरगढ, भगवानपूर, सारंगा यां गावी आजही नामदेव मंदिरे उभी आहेत. भागवतधर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव हे पहिले संत होत. तिथे त्यांनी भक्तिमार्गाचा शुभारंभ केला.
त्यातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक अशा संतजनांना प्रेरणा मिळाली. “आंतर भारती’चा पहिला प्रयत्न त्यांनी सफल करून दाखविला. आपल्या साध्यासुध्या आणि सहजसत्य अशा वाणीच्या बळावर त्यांनी देश आणि काळ यांच्या सीमा ओलांडल्या. नामदेवांचे हे यश फार मोठे आहे. नामदेवांची समाधी पंढरपूरला श्रीविठ्ठलाच्या पायाशी आहे. आपल्या परिवारातील चौदा सदस्यांसह त्यांनी शनिवार आषाढ वद्य त्रयोदशी, शके 1272 (इ.स. 3 जुलै 1350) या दिवशी समाधी घेतली. “नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे। संत पाय हिरे देती वरी।।” या अभंगात नामदेवांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे आपले सर्वस्व त्यांनी श्रीविठ्ठलाच्या पायांजवळ अर्पण केले. जगातले आपल्या आयुष्याचे कार्य संपले आहे, हे लक्षात घेऊन साधुसंत स्वतःहून समाधिस्थ होतात, देहाचा त्याग करतात; त्या जागी त्यांचे स्मारक उभे केले जाते, तेच त्यांचे मूळ समाधिस्थान होय. नामदेवांच्या मोठेपणाचे मर्म दोन वाक्यांत सांगता येईल ः त्यांनी प्रपंचाची भक्ती केली नाही, तर भक्तीचाच प्रपंच केला!