– डॉ. मेघश्री दळवी
प्रचंड प्रमाणात भूजलाचा उपसा केल्याने पृथ्वीचा अक्ष कलला अशी बातमी गेले काही आठवडे आपण ऐकतो आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी 71 टक्के म्हणजे जवळजवळ तीनचतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. समुद्र, नद्या, जलाशय, तळी मिळून हा 71 टक्के भाग होतो. त्यात भर आहे ती भूजलाची, जमिनीखालील पाण्याची. मुख्यत: वनस्पती हे पाणी वापरतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरून त्याची पुन्हा भरपाई होते. मात्र वाढत्या लोकसंख्येला पृष्ठभागावरचे पाणी पुरेनासे झालं आणि आपण जमिनीखालचे पाणी उपसायला सुरुवात केली.
याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो हे ठाऊक असूनही आपण आपली तात्पुरती सोय पाहिली. आता एका अभ्यासातून दिसून आलं आहे की 1993 ते 2010 या केवळ 17 वर्षांमध्ये भूगर्भातून 2 ट्रिलियन टनांपेक्षा जास्त पाणी उपसलेलं आहे. साहजिकच वनस्पतींना पाणी कमी पडतं, विहिरी खूप खोलवर खणल्याशिवाय पाणी मिळत नाही आणि जमिनीची धूप वाढत जाते.
यूएसए, हॉंगकॉंग, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या देशांमधील शास्त्रज्ञांच्या संयुक्त टीमने हा अभ्यास केला. त्यावरचा शोधनिबंध “जिओ फिजिकल रिसर्च लेटर्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटलं आहे की, प्रमाणाबाहेर उपसा केल्याने जमिनीखालील पाण्याच्या साठ्याची विभागणी बदलली आहे. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव दरवर्षी सुमारे 4 सेंटीमीटर वेगाने पूर्वेकडे सरकत आहे. त्यामुळे पृथ्वीचा अक्ष कलत असून पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यात बदल होऊ शकतो. त्याचा प्रभाव कदाचित हवामान, तापमान आणि ऋतुचक्रावर दिसून येईल, असा इशारा या टीमने दिला आहे.
जमिनीखालचं पाणी खेचल्याने याच कालावधीत समुद्राची पातळी सहा मिलीमीटरने वाढल्याचं या अभ्यासाचं निरीक्षण आहे. आजवरच्या अभ्यासात हिमनग आणि हिमनद्या वितळल्याने समुद्राची पातळी वाढल्याचा विचार होत होता. भूजल उपशाचा परिणाम अशा पद्धतीने पहिल्यांदाच मोजला आहे. भूजलपातळी खालावण्याचे प्रमाण उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात आणि वायव्य भारतात सर्वात जास्त असल्याची नोंद या अभ्यासात आहे. पंजाब व हरियाणा राज्यात पिकांच्या सिंचनासाठी अशा पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्यासाठी ही नोंद महत्त्वाची आहे.
जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी खचत चालली आहे, समुद्रात बुडत चालली आहे. त्यामागे समुद्राची पातळी वाढण्यासोबत भूजलाचा बेसुमार उपसा हेही एक कारण आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीने दिल्लीतील दोन भागात जमीन खचण्याचा अभ्यास केला आहेत. तिथे अति प्रमाणात जमिनीतलं पाणी खेचून घेणं हेच कारण मिळालं आहे. भूजल उपशाचे आणखी काही परिणाम असतील तर त्यांचाही अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाय योजता येतील. सॅटलाइट्सच्या मदतीने जमीन खचते आहे का याचा माग घेता येईल. नैसर्गिक परिसंस्था आणि शाश्वत राहणीमान यासाठी पुरेसा भूजलसाठा आवश्यक आहे.