मुंबई- दोन दिवसीय कोकण दौऱ्यानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत पवारांनी कोकणातील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा मांडत कोकणाला पुन्हा उभे करण्यासाठीचा ऍक्शन प्लॅनच मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे. तसेच कोकणातील फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी या भेटीत सांगितले.
ही बैठक मुंबईतील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे, रायगडचे खासदार सुनिल तटकरे उपस्थितीत होते. या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच विद्युत आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची तयारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे.
फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करण्याची गरज असल्याचा मुद्दाही शरद पवार यांनी बैठकीत मांडला. कचऱ्याचे ढिगारे साफ करुन घरे, बागा आणि दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठं काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
प्रमुख मागण्या
– प्रत्येक पीडित कुटुंबाला दरमहा किमान 5 लिटर केरोसिन.
– पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज.
– नवीन कर्ज देण्यासाठी बॅंका सुरु होणे गरजेचे.