आनंद गांधी
महनीय व्यक्तींची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त तसेच सणांच्या भारतात सुट्ट्या दिल्या जातात. याबाबत समाजमाध्यमांवर सध्या चर्चा सुरू आहे की, खरंच अशा सुट्ट्यांची गरज आहे का? कारण सरकारी कार्यालये आणि बॅंकांना असलेल्या या सुट्ट्यांमुळे सर्वसामान्यांना खरे तर हालअपेष्टाच सहन कराव्या लागतात.
स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शासकीय कार्यालये, बॅंकांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य आणि खेदही व्यक्त केला. समाजमाध्यमं हे मुक्तपणानं अभिव्यक्त होण्यासाठीचं हक्काचं व्यासपीठ असल्यामुळे इथं अनेकदा अप्रस्तुत किंवा आक्षेपार्ह मतं व्यक्त केली जात असली तरी काही मुद्दे हे विचार करायला लावणारे असतात. दीदींच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्यांमुळे एकंदरीतच महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीनिमित्तच्या सरकारी सुट्ट्यांवरून चर्चेला तोंड फुटलं आहे. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं एका प्रकरणाचा निकाल देताना सार्वजनिक सुट्ट्या हा हक्क नाही, असं नमूद करतानाच सुट्ट्यांची संख्या कमी करण्याची वेळ आल्याचं म्हटलं होतं.
खरं पाहता समाजात महान व्यक्तिमत्त्वं म्हणून ज्यांना अधिमान्यता मिळते त्यांनी अत्यंत कष्टातून, संघर्षातून वाटचाल केलेली असते. या परिश्रमांच्या जोरावरच त्यांना शून्यातून विश्वनिर्मिती करता येणं शक्य होतं आणि म्हणूनच समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो. खुद्द लतादीदींचेच उदाहरण घेतले तर सुरेल आवाजाचं देणं त्यांना निसर्गतः लाभलेलं असलं तरी त्याला अफाट रियाजाची जोड होती. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत तानपुरा घेऊन दीदी रियाज करायच्या. वयाच्या नव्वदीपर्यंत त्यांनी काम केलं. लहानपणी वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाला सावरण्यासाठी दीदींनी केलेले कष्ट विलक्षण होते. दिवसातल्या कोणत्याही वेळांमध्ये जाऊन त्यांनी रेकॉर्डिंग केलं.
ज्या महात्मा गांधीजींच्या जयंतीला आपल्याकडे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते त्या गांधीजींनी संपूर्ण आयुष्य कार्यमग्नतेत व्यतित केलं. प्रत्येक क्षण सत्कारणी लावणं, हेच या महान व्यक्तिमत्त्वांनी आपलं जीवनसूत्र बनवलं होतं. म्हणूनच त्यांना इतिहास रचता आला आणि सातासमुद्रापार त्यांची कीर्ती पोहोचली. असं असताना त्यांच्या स्मरणाच्या नावाखाली सरकारी सुट्ट्या जाहीर करणं हा विरोधाभास असल्याचं मत व्यक्त केलं जात असेल तर ते अनाठायी म्हणता येणार नाही. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्तानं जाहीर केल्या जाणाऱ्या सुट्ट्यांचा मुद्दा हा यापूर्वीही अनेकदा चर्चिला गेला आहे.
भारत हा सुट्ट्यांचा देश आहे, असं अनेकदा उपहासानंही म्हटलं जातं. भारतीय लोक उत्सवप्रिय असल्यानं अनेक सण साजरे करीत असतात. त्या सणांना सरकारी सुट्ट्या न दिल्यास सणप्रिय लोक नाराज होतात. म्हणून जवळपास सगळ्या महत्त्वाच्या सणांना सरकार सुट्ट्या देत असते. आज जमाना बदलला आहे आणि जगण्याचे सारे संदर्भ बदलले आहेत. या बदलत्या काळात बरेच सण हे औपचारिकता असे राहिले आहेत. कित्येक जण ते सण साजरेही करत नाहीत; पण त्यानिमित्तानं सुट्टी मात्र दिली जाते. भारतात अनेक धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहात असल्याने अशा सणांची आणि सुट्ट्यांची संख्या मोठी झाली आहे.
दुसरीकडे जागतिक प्रवाहांच्या अनुकरणार्थ पाच दिवसांचा आठवडा ही नवी संकल्पना उदयास आली आहे. वर्षाच्या 365 दिवसांमध्ये जवळपास 150 हून अधिक दिवस सुट्ट्यांचेच असतील तर असा देश प्रगती कशी करणार, असा प्रश्न पडतो. एका आंतरराष्ट्रीय
सर्वेक्षणानुसार जगात सर्वात जास्त सार्वजनिक सुट्ट्या भारतात असतात. पोर्तुगाल सरकारने मागील काळात आपला खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी 14 सरकारी सुट्ट्यांची संख्या कमी करत 10 वर आणली होती. ग्रेट ब्रिटनमधील एका सर्वेक्षणानुसार तिथे प्रत्येक सुट्टीमुळे बॅंकांना 230 कोटी पाउंड म्हणजेच, 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले की, बॅंकांना सुट्टी नसेल, तर ग्रेट ब्रिटनचा विकास 1.3 टक्के इतका वाढू शकतो. हाच निकष कमी-अधिक फरकाने भारतासही लागू होतो.
आज नागरी समस्यांचा डोलारा इतका प्रचंड वाढलेला असताना आणि सरकारी कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवून सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असताना नव्या सुट्ट्यांची त्यात भर पडत जाणार असेल तर त्याचा त्रागा वाढणं स्वाभाविक आहे. बरे ही सुट्ट्यांची चंगळही एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित आहे. सावलीत काम करणाऱ्यांना उन्हाळ्याची सुट्टी मिळते तर गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांना अशा आदरांजली अथवा जयंती, पुण्यतिथींची सुट्टी मिळते. हातावर पोट असलेला कामगार, खासगी क्षेत्रात काम करणारा नोकरदार, लहानमोठे व्यापारी निगुतीने आपले काम करतात. त्यांना ही चैन परवडत नाही. त्यांना व्यवसाय आणि आपल्या कुटुंबाचे अर्थकारण सांभाळायचे असते. घरी बसलो अथवा सण साजरा केला असे क्षण त्यांच्या वाट्याला फारशे येत नाहीत.
लतादीदींच्या निधनानंतर अचानकपणानं सुट्टी जाहीर केल्यामुळे सरकारी कार्यालये, बॅंकांचे कामकाज बंद राहिले. यामुळे हजारो-लाखो जणांचे नियोजन कोलमडून पडले. अनेकांची मोठी गैरसोय झाली. दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देताना त्यांचा पगार मात्र कायम राहतो आणि तो जनतेच्या कररूपी पैशातून दिला जातो. आज सरकारी कार्यालयांमधील किंवा बॅंकांमधील एका कर्मचाऱ्याचे दिवसाचे वेतन हे किमान 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये इतके आहे. यावरून दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे सामान्यांच्या किती पैशांचे नुकसान झालं असेल याचा अंदाज येईल. शिवाय अनेक आर्थिक व्यवहार खोळंबल्याने, वेतनाला उशीर झाल्यामुळे हप्ते भरण्यात अडचणी आल्यामुळे झालेला मनस्ताप वेगळाच.
आधीच गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे आर्थिक उलाढालींवर कमालीचे नकारात्मक परिणाम झाले आहेत. लॉकडाऊनमुळे कित्येक दिवस सरकारी कार्यालयांमधील कामं रेंगाळली आहेत. अशा स्थितीत कोविडनंतरच्या काळात कार्यालयीन तास वाढवण्याची किंवा सुट्ट्यांची संख्या कमी करण्याची गरज व्यक्त होत असताना अशा प्रकारे अचानकपणानं नव्या सुट्ट्या देणं कितपत योग्य आहे. यामुळे सामान्य माणूस नाराजीपूर्वक प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याला चुकीचे ठरवता येणार नाही. तसेच त्याला लतादीदींच्या महनीयतेशी जोडून पाहणं हीदेखील दिशाभूल ठरेल. लतादीदींवर असणारं प्रेम आणि त्यांच्या जाण्याने झालेलं दुःख या दोन्हीही बाबी सरकारी सुट्ट्या जाहीर न केल्यामुळे निश्चितच कमी झाल्या नसत्या.
दुसरं असं की, आपण महापुरुषांच्या नावानं सुट्ट्या जाहीर करण्याऐवजी त्यांच्याप्रमाणे समाजातील प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अत्युच्च आणि अत्युत्तम योगदान देण्यासाठी कार्यप्रवण केलं तर त्यातून देशाच्या प्रगतीला, विकासाला हातभार लागेल आणि सबंध समाजाचं हित साधलं जाईल. पण आधुनिकतेचा उद्घोष जितक्या जोमानं केला जातो तितक्या गांभीर्यानं कृती केली जात नाही, ही आपली खरी शोकांतिका आहे. खरं म्हणजे समाजात होऊन गेलेल्या प्रत्येक महापुरुषानं समाजाप्रतीचं आपलं दायित्व म्हणून भरभरून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामागचा उद्देश इतकाच की आपल्या ओंजळभर योगदानानं सामान्यांचं जगणं सुखकर व्हावं.
अशा व्यक्तिमत्त्वांचे आदर्श घेऊन वाटचाल करताना सामान्यांच्या समस्यांमध्ये भर पडेल, अशी कृती करणं याचा अर्थ आपल्याला त्यांचं आकलनच झालेलं नाहीये असा होतो. सारांश, आपली जुनी विचारसरणी बदलून आता महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीच्या दिवशी लोकांना अधिक काम करण्याची प्रेरणा दिली पाहिजे. कारण अशी कार्यसंस्कृती, श्रमसंस्कृतीच देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवेल. कार्यमग्नता हीच खरी ईश्वर सेवा आहे. किंबहुना, तीच या दीपस्तंभांना आदरांजली ठरेल.