पुणे – पाल्याला ताप, सर्दी, खोकला असेल तर त्याला शाळेत पाठवू नका. त्याला पुढील सात दिवस घरातच विलगीकरणात ठेवा, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.
मंगळवारपासून पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. मुलेही घरी बसून कंटाळले असल्याने शाळेत जाण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे कन्सेट लेटर देऊन पालकांनीही मुलांना शाळेत सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, कितीही काळजी घेतली तरी मुले एकत्र एका वर्गात खेळणार, एकत्र राहणार त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीतीही पालकांच्या मनात आहे. दुसरीकडे मात्र ऑनलाइन शाळेऐवजी ऑफलाइन शाळाच योग्य आहे, अशी मनोमन खात्रीही आहे. त्यामुळे या द्वंद्वात अनेक पालक आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण काळजी घेऊन मुलांना शाळेत पाठवू शकता, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
ओमायक्रॉनचा आजार सर्वसाधारणपणे सौम्य असल्याचे आतापर्यंतचे निरीक्षण आहे. या विषाणूचा संसर्ग फुफ्फुसांपर्यंत जात नसल्याने न्यूमोनियाचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे पालकांनी घाबरण्याचे कारण नाही. शाळेतील एकूण मुलांच्या संख्येत जास्तीत जास्त मुलांना सर्दी, ताप, खोकला, अशी लक्षणे दिसल्यास शाळा सुरू ठेवायची की, बंद करायची याचा निर्णय स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे, असेही बालरोग तज्ज्ञ संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी स्पष्ट केले.
शाळा सुरू झाल्यानंतर मुले एकमेकांच्या संपर्कात येणे स्वाभाविक आहे. पण, त्यातही शाळांनी नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्स व्यवस्थित ठेवावे. आजारी मुलांच्या संपर्कात आलेल्या पण लक्षणे नसलेल्या मुलांची आणि शिक्षकांची करोना चाचणी करण्याची गरज नाही. त्यांच्यामध्ये लक्षणे निर्माण होत नाहीत ना याकडे लक्ष ठेवावे.
– डॉ. प्रमोद जोग, बालरोग तज्ज्ञ