नारायणगाव -शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणीबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
या पूर्वीच कृषी विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला दिला होता.
अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते व दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता आहे.
आठ दिवसांपासून महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे; परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे.