नगर – पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी, शिरापूर, या भागात बिबट्याच्या हल्ल्यात आठवडाभरात तीन बालकांना आपला जीव गमवावा लागला. जिल्ह्यामध्ये बिबट्यांची असणारी संख्या व सतत होणारा मानव बिबट्या संघर्ष पाहता पकडलेले बिबटे कुठे सोडावे हा वन विभागापुढे यक्ष प्रश्न असतो. नगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील निवारा केंद्राचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करावे अन्यथा नेवासे तालुक्यातील मोरया चिंचोली या वनक्षेत्रात नव्याने बिबट निवारा केंद्राचा प्रस्ताव वन विभागाने तयार करावा अशी, मागणी राष्ट्रीय वाघ संरक्षण समितीचे सदस्य व नेचर लव्हर्स क्लब चे पदाधिकारी मंदार साबळे यांनी केली आहे.
साबळे यांनी रविवारी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे जाऊन तिन्ही हल्ल्यांबाबत व उपाय योजनांबाबत उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्याशी चर्चा केली. यावेळी नगरचे सहायक वनसंरक्षक किशोर सोनवणे, सुनिल पाटील, पुणे येथील सहायक वनसंरक्षक संजय कडू, नाशिक येथील सहायक वनसंरक्षक नेवसे, व नगरचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नगर, नेवासे, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोला, आश्वी, शेवगाव आदी भागात बिबट्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे बेलवंडी पेक्षा नेवासे हे ठिकाण या सर्व भागांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असून येथील मोरया चिंचोली चे वनक्षेत्र या रेस्क्यू सेंटर साठी योग्य ठिकाण ठरू शकेल तसेच या ठिकाणी वन पर्यटनाचे कामही सुरू आहे. त्यातच इथे निवारा केंद्र झाले तर पर्यटनाच्या दृष्टीनेही ते महत्वाचे ठरेल. जिल्ह्यात ऊस क्षेत्र मोठे असल्याने बिबट्यास लपण्यास जागा मिळते व त्याची संख्या झपाट्याने वाढत आहे.
एकीकडे वन्य जीव वाचवणे हेही गरजेचे आहे तर दुसरीकडे मानवी जीवन सुरक्षा हा मुद्दाही महत्वाचा आहे, त्यामुळे भविष्यात होणारा मानव वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी लवकरात लवकर निवारा केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे प्रस्तावित बिबट्या निवारा केंद्र (रेस्क्यू सेंटर) मंजूर झाले होते मात्र, त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. ते काम लवकरात लवकर मार्गी लावावे.