पिंपरी – बहिणीशी वाद घालणाऱ्या मुलाला त्याचे वडील ओरडले. या कारणावरून मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री रुपीनगर येथे घडली.
प्रणय किशोर भोई (वय 20, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. सध्या लॉकडाऊनमुळे सुट्टी असल्याने तो घरीच होता. रविवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास प्रणव याची बहीण देव्हाऱ्यातील निरांजनला मच्छर पळविण्याची अगरबत्ती पेटवत होती. यामुळे प्रणव याने बहिणीशी वाद घातला. त्यावेळी तिथे असलेल्या वडीलांनी प्रणवला रागावून त्याच्या खोलीत जाण्यास सांगितले. यामुळे प्रणव रागारागाने आपल्या खोलीत गेला.
रात्री तो जेवण करण्यासाठी आला नाही म्हणून वडील त्याच्या खोलीत पाहण्यासाठी गेले. आवाज देऊनही त्याने दरवाजा उघडला नाही. यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी प्रणव याने साडीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याच्या वडीलांनी त्यास त्वरीत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.