पिंपरी – राज्यात कसलीही परिस्थिती गंभीर नाही, सर्व काही ठीक आहे. मात्र काही जण परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला कसे पुरून उरायचे हे शरद पवार यांचे मार्गदर्शन असल्यामुळे तशी काही परिस्थिती बिघडत नाही. त्यामुळे कोणीच काळजी करू नका, असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना लगावला.
चिंचवड येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या निवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभादरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी विरोधक निर्माण करत असलेल्या वातावरणावर भाष्य केले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र अशी कोणतीही गंभीर परिस्थिती आपल्या राज्यात नाही. ती बिघडवणाऱ्यांसोबत कसे लढायचे, याचे मार्गदर्शन शरद पवार यांच्याकडून मिळत आहे. त्यामुळे विरोधकांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. तर नागरिकांनी परिस्थितीबाबत काळजी करू नये.
असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
तसेच अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह सहा जणांना एनसीबीने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी (दि. 27) निर्दोष सोडले. याबाबत विचारले असता ते म्हणाले, अमंली पदार्थ बाळगणे व सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने आता आर्यन खान याचे नाव आरोपपत्रातून वगळले आहे. याबाबत गृहमंत्री म्हणाले की, एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आहे. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
“तो’ काही आंतराराष्ट्रीय मुद्दा नाही
नवनीत राणा आणि रवी राणा नागपूर विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावर दिलीप वळसे पाटील यांनी जास्त काही न बोलता सध्या तो काही आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही, त्यामुळे त्याला एवढे महत्त्व द्यायची गरज नाही, असे म्हटले आहे.