मुंबई – राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा या योजनेंतर्गत रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांत 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ व 1 लिटर पामतेल वस्तू देण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात याचे वाटप सुरु आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी याचा लाभ घेतला आहे. मात्र काही ठिकाणी अद्यापही वाटपात अडचणी येत असल्याचे समरो आले आहे. तर काही ठिकाणी त्या किटमध्ये एखादी वस्तू कमी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
राज्यात काही ठिकाणी आनंदाच्या शिध्यातून तेल गायब झाल्याचं समोर आले होते. आता आनंदाच्या शिध्यामधून साखरच गायब झाली असल्याच्या तक्रारी येत आहेत. शिवाय आनंदाचा शिधा वाटप करताना लाभार्थ्यांकडून मात्र पैसे पूर्ण घेण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, तुळशी विवाहापर्यंत दिवाळी असते तोपर्यंत हा शिधा पोहोचेल असं अजब वक्तव्य आज मंत्री दीपक केसरकर यांनी केल्यानंतर धुळे शहरात मात्र एक नवीनच प्रकार याबाबत समोर आला आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी सुरुवातीपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन दुकानांमधून वस्तू मिळण्यास विलंब होत आहे. काही कार्डधारकांना दिवाळीचा आनंदाचा शिधा मिळाला आहे, तर काहींना तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही आनंदाचा शिधा मिळू शकलेला नाही. त्यात औरंगाबादमध्ये काही ठिकाणी शिध्यातून तेल पाऊच गायब असल्याचे समोर आले होते.