मुंबई – राज्य सरकारकडून नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. 100 रुपयांमध्ये हा शिधा उपलब्ध करून दिला जाणार आहे. गेल्या वर्षीही राज्य सरकारडून आनंदाचा शिधा देण्यात आला होता. त्यानंतर याहीवर्षी देण्यात येणार असून यंदा या शिधामध्ये अधिकच्या दोन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. अनेक महत्वाच्या निर्णयासह दिवाळीला दिला जाणाऱ्या आनंदाच्या शिधाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. शिधा वाटपाची जबाबदारी ही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयावर असणार आहे.
मैदा आणि पोह्याचा समावेश –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.
1 कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रिकाधारकांना मिळणार आनंदाचा शिधा –
राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे त्याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना अशा 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.
530 कोटी 19 लाख खर्च –
आंनदाचा शिधा या संचात 1 किलो साखर, 1 लीटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा असणार आहे. हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 530 कोटी 19 लाख इतक्या खर्चासदेखील आजच्या कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.