मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे शेती पीकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला होता.
उद्धव ठाकरे यांनी दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची पाहणी केली होती. ठाकरेंच्या या दौऱ्यावरुन शिंदे गट आणि भाजपने मात्र त्यांच्यावर टीका केली. भाजप नेते आणि माजी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनीही उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. ओला दुष्काळ म्हणजे काय हे उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलं पाहिजे. मागण्या करत असताना त्यांना पीक काय, पीक खाली येतं का वर, खरीप काय, रब्बी काय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे, अशी टीका करत प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळतं का? असा सवालही उपस्थित केला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतून टीका होण्याची शक्यता आहे.