मुंबई – मागील काही दिवसांपासून भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अनेक नेत्यांची चौकशीही सुरू आहे. तर काहींना समन्स गेले आहेत. आता सोमय्या यांनी आपला मोर्चा मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे वळवला असून थेट त्यांना नोकरीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
सोमय्या यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, जालना साखर कारखान्याचे मालक खोतकर कुटुंबीय आणि मुळे कुटुंबीय आहेत. त्यातल्या एक भागधारक या मोठ्या अधिकाऱ्याच्या पत्नी आहेत. त्यांचे नाव रुपाली विश्वास पाटील असे आहे. त्या मुंबई पोलीस दलाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.
मुंबईचा एक पोलीस सहआयुक्त बेनामी पद्धतीने साखर कारखाना घेतो. दुसरा पोलीस सहआयुक्त मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेली चौकशी बंद करतो. वास्तविक पाहता खरी माहिती ही आहे की, जून २०१९ मध्ये स्वतः उच्च न्यायालयाने बेनामी पद्धतीने खरेदी केलेल्या साखर कारखाण्याचे बारकाईने तपास करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तसा तपास करण्यात आला नसल्याचा दावा सोमय्या यांनी केली.
दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.