सोलापूर – रब्बीचा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. मात्र पीकपद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे आठ वर्षांत रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा आता खरिपाचा जिल्हा म्हणूनही ओळखू लागला आहे. गेल्या आठ वर्षात उडीद, तूर, सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्यामुळे रब्बीला मागे टाकत जिल्ह्यात खरिपाच्या जोर धरला आहे.
शेतकऱ्यांनी 2014 सालापासून आपल्या पीकपद्धतीत बदल केल्याचे हे परिणाम असल्याचे कृषी क्षेत्रातही तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे. उडीद, सोयाबीन, तूर, चवळी, मटकी ही पिके घेण्याकडे बळीराजाचा वाढता कल खरिपाचे क्षेत्र वाढीला कारणीभूत ठरला आहे. मागील आठ वर्षात सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सहा पटीने वाढले आहे.
शेतीसाठी उपलब्ध होणारी जमीन, भौगोलिक परिस्थिती आणि पाऊस यावर सोलापूर जिल्ह्याची ओळख रब्बीचा जिल्हा म्हणून होती. यापूर्वी खरिपात सूर्यफूल, तूर, मूग, मका, भुईमूग, बाजरी अशी पिके घेण्यात येत होती. तर त्याचवेळी ज्वारी, सूर्यफूल, जवस, गहू, हरभरा, करडई ही रब्बी हंगामातील पिकेसुद्धा घेण्यात येत होती. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आणि पीकपद्धतीत कमालीचे बदल झाले.
पावसाच्या बदलावरून पिकाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल घडत गेले. शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे वाढला. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले. ज्यामध्ये तूर, उडीद व सोयाबीन पिकांचे क्षेत्र वाढले. तर ही पिके काढून त्याच जमिनीत पुन्हा रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व हरभरा ही पिके घेण्यात येत आहेत. त्यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढले.
तुरीच्या क्षेत्रात वाढ झाल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात 2 लाख हेक्टरने घट झाल्याचे दिसून आले आहे. 2013 सालात 6 लाख 78 हजार 56 इतके हेक्टर क्षेत्र रब्बीचे होते.मात्र 2020 मध्ये रब्बीचे हेच क्षेत्र 4 लाख 40 हजार 628 हेक्टरवर आले आहे. पावसाचा अति परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 2013 सालात खरिपाचे क्षेत्र केवळ 58 हजार 410 हेक्टर होते मात्र 2020 मध्ये हेच क्षेत्र वाढून 3 लाख 74 हजार 12 हेक्टरवर गेल्याचे दिसत आहे.