सातारा – पगार वेळेवर होत नसल्याची तक्रार करत शहरातील घंटागाडी चालकांनी शनिवारी काम बंद आंदोलन केले. घंटागाडी चालकांच्या काम बंद आंदोलनामुळे कचरा संकलनाची प्रक्रिया ठप्प झाली. मात्र, घंटागाडी ठेकेदाराने पगार वेळेवर केल्याचा दावा केला आहे.
घंटागाडी चालकांचा पगार गेल्या सहा महिन्यापासून मिळत होत नसल्याची तक्रार आहे. घंटागाडी चालकांच्या ठेकेदाराची मुदत मार्च महिन्यातच संपली आहे. मात्र, नवीन ठेकेदार नेमला जाईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ही व्यवस्था करण्यात आली आहे. घंटागाडी चालकांनी शनिवारी कचरा संकलन सोडून पालिकेच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली. वेळेवर पगार करा अन्यथा काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. दिवसभर घंटागाडी न फिरल्यामुळे सातारा शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा तसाच पडून होता. याप्रकरणी आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांनी तत्काळ मध्यस्थी करून मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
त्यावेळी येत्या दोन दिवसांत पगार केला जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी बॅंकांची सुट्टी आल्यामुळे पगार होऊ शकले नव्हते. तरीसुद्धा ठेकेदाराने शनिवारी पर्यायी व्यवस्था उभी करून कर्मचाऱ्यांचे पगार केल्याचे समजते. याशिवाय कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी वेळेवर भरला जात नसल्याची सुद्धा ओरड होत आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदार साबळे यांच्याशी संपर्क साधला असता “”काही तांत्रिक बाबींमुळे पगार लांबले होते आणि भविष्य निर्वाह निधी वेळेवर भरला जात आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांकडे अपुरी माहिती असल्यामुळे कदाचित ते असे सांगत आहेत. मात्र, ईपीएफ जमा केल्याशिवाय घंटागाडीचे बिलच निघत नाही,” असे ठेकेदार साबळे यांनी स्पष्ट केले.