नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मात्र, स्वत: खर्गे यांनी त्याविषयीचा निर्णय नंतर घेण्याची भूमिका मांडली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत इंडियाचा चेहरा कोण असणार, हा प्रश्न तूर्त अनिर्णित राहिला.
इंडियाच्या बैठकीत ममता आणि केजरीवाल यांनी आघाडीचा चेहरा म्हणून खर्गे यांचे नाव पुढे केले. मात्र, खर्गे यांनी तो विषय खुबीने टाळला. आधी जिंकू; नंतर त्यावर विचार करू. माझी वैयक्तिक कुठलीही अपेक्षा नाही, अशी टिप्पणी खर्गे यांनी केली.
त्यातून पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करता निवडणुकीला सामोरे जाण्याची कॉंग्रेसची रणनीती असल्याचे अधोरेखित झाले. ममता आणि केजरीवाल यांनी खर्गे यांचे नाव पुढे केल्याने इंडियाचे नेतृत्व कॉंग्रेसकडे सोपवण्यास घटक पक्ष राजी असल्याचेही स्पष्ट संकेत मिळाले.