नागपूर: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाल्यापासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्र घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांच्या याच पावित्र्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केल आहे. महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असे भाजपला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सावरकरांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या दिवसापासून शेतकरी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. या टिकेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील विरोधकांचं खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राज्यासाठी कोणतीही ठोस आश्वासने नसल्यामुळे सभात्याग करीत असल्याचे सांगत सभात्याग केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, तिसऱ्या दिवसापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपकडून मानसिक दबाव कसा आणला जाईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी सुद्धा लाखोच्या सभा घेतल्या आहेत. त्यामुळे असे काही केल्याने ठाकरेंवर दबाव येणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.
तसेच ‘जगातील लोकशाहीमध्ये हा नियम आहे की, कोणतेही नवीन सरकार स्थापन झाल्यास त्यांना किमान सहा महिने कामकाज समजण्यासाठी वेळ दिला जात असतो. त्यांनतर विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे. विरोधकांनी विरोध करू नयेत असे माझे म्हणणे नाही, मात्र लोकशाहीचे काही अलिखित नियम असतात ते सुद्धा पाळले गेली पाहिजे असेही आव्हाड म्हणाले.