मुंबई – मॉल धारकांची संघटना असलेल्या शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने महाराष्ट्रातील कामकाज सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन घेतले असले पाहिजे. त्याचबरोबर दोन डोस घेतलेल्या ग्राहकांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात यावा असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये लसीचा तुटवडा असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे दोन डोस झालेले नाहीत. त्याचबरोबर ग्राहकांचे दोन डोस झालेले नाहीत. अशा परिस्थितीत या नियमाची अंमलबजावणी करणे शक्य नसल्यामुळे आम्ही मॉल न उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे या संघटनेने पत्रकात म्हटले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी किमान एक महिना लागू शकतो. त्याचबरोबर लसीचा तुटवडा असल्यामुळे ग्राहकांचे पूर्ण लसीकरण झालेले नाही. अशा परिस्थितीमध्ये कामकाज सुरू करणे शक्य नसल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
मॉलमधील जवळजवळ 80 टक्के कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र तुटवडा असल्यामुळे दुसरा डोस घेता आलेला नाही. करोना व्हायरसमुळे 270 दिवसापासून मॉलचे कामकाज बंद आहे. महाराष्ट्र सरकारने एक डोस घेतलेल्या कर्मचाऱ्याला मॉलमध्ये काम करू देण्याची गरज आहे असे या संघटनेला वाटते.