कोलकता : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोना फैलावाने एका आघाडीवर मात्र पश्चिम बंगालला मोठाच दिलासा दिला आहे. त्या राज्यात बांगलादेश सीमेवरून होणारी तस्करी, घुसखोरी मागील काही आठवड्यांत नीचांकी पातळीवर पोहचली आहे. पश्चिम बंगाललगत असणारी बांगलादेश सीमा तस्करी आणि घुसखोरीच्या घटनांमुळे काही दशकांपासून कुख्यात ठरली आहे.
त्या सीमेचा गैरवापर घुसखोर बंगालमध्ये अवैध शिरकावासाठी करतात. त्याशिवाय, त्या सीमेवरून बनावट भारतीय नोटांची, सोन्याची आणि अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. त्या घटना पश्चिम बंगालमध्ये नेहमीच ज्वलंत राजकीय मुद्दे ठरतात.
मात्र, करोनाचा फैलाव आणि तो रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आदींमुळे तस्करीला आणि घुसखोरीला लक्षणीय प्रमाणात आळा बसला आहे. त्याबाबतची माहिती भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) देण्यात आली.
करोना फैलावामुळे तस्कर आणि घुसखोर धास्तावले आहेत. त्याशिवाय, निर्बंधांमुळे ते घरांबाहेर पडू शकत नाहीत. बीएसएफच्या जवानांची गस्तही वाढली आहे. त्या सर्वांचा परिणाम होऊन तस्कर आणि घुसखोरांच्या कारवाया थंडावल्या आहेत. अर्थात, आमच्याकडून गस्त आणि पहाऱ्यात कुठलीही ढिलाई केली जाणार नाही, अशी ग्वाही बीएसएफने दिली.