Smriti Irani’s challenge Rahul Gandhi – केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वायनाडला न जाता, फक्त अमेठी लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, वायनाडमधून विजय मिळवून राहुल गांधी संसदेत पोहोचले.सोमवारी स्मृती इराणी आणि राहुल गांधी दोघेही अमेठीत होते.
स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींबाबत त्या म्हणाल्या की, २०१९ मध्ये गांधी यांनी अमेठी सोडले होते, आज अमेठीने त्यांना सोडले आहे. जर त्यांना आत्मविश्वास असेल तर त्यांनी वायनाडला न जाता अमेठीतून (निवडणूक) लढवावी आणि विजयी होऊन दाखवावे.
सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेची उमेदवारी दाखल केल्यानंतरही स्मृती इराणींनी गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, गांधी परिवार आपली जागा सोडेल, असा विचार कोणीही केला नव्हता.
रायबरेलीच्या लोकांना माहित आहे की अमेठीचे खासदार आणि योगी सरकार त्यांच्यासाठी वाट्टेल ते करत आहेत. सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. सोनिया गांधींच्या जागी प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.