लेखन ही एक कला आहे. ती सर्वांनाच साध्य होत नाही. त्यासाठी सखोल अभ्यास, चिंतन, मनन आणि भरपूर वाचन आवश्यक आहे. माणसाच्या ज्ञान लालसेतून “लेखन आणि वाचन’ या कला विकसित झाल्या आहेत. सखोल वाचन आणि कौशल्यपूर्ण लेखन यावरच व्यक्तीची गुणवत्ता ठरविली जाते. सुंदर हस्ताक्षर हेसुद्धा त्या व्यक्तीची ओळख असते. परंतु हस्ताक्षर आपोआप सुंदर होत नाही. त्यासाठी भरपूर लेखन सरावाची आवश्यकता असते.
सुंदर हस्ताक्षरातून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसते. माणसाच्या मनातील विविध भाव आणि भावना या व्यक्त करण्याचं एक ठोस माध्यम म्हणजेच आपली बोलीभाषा. बोलीभाषेतून आपण जे समाजोपयोगी तत्त्वज्ञान, उपदेश, शिकवण देत असतो ते ज्ञान कुठेतरी साठवून पुढील पिढीच्या उपयोगी पडावं. याच प्रांजळ उद्देशाने लेखन कला विकसित झाली असावी आणि यातूनच पुढे माणसाचं जीवनमान आणि आचरण खऱ्या अर्थाने विकसित झालं आणि त्यामुळेच ज्ञानाच्या अगाध सागरात उतरून माणसाला तत्त्वज्ञानाचा मौलिक खजिना सापडू लागला, हेही तेवढंच खरं.
प्राचीन काळापासूनच लेखन कला विकसित झालेली आहे. त्याकाळी लेखन, वाचनासह संपूर्ण शिक्षणच संस्कृतमधून असायचे. “गुरुकुल’ पद्धती असल्यामुळे ठराविक कुळातील लोकांनाच शिक्षण घेता येत होते. अर्थातच अगदी थोडेबहुत लोकच ज्ञानप्राप्ती करू शकत होते. मात्र, पुढील काळात ज्ञानाची ही बंदिस्त कवाडे उघडल्या गेल्या आणि त्यासोबतच समाजातील प्रत्येक घटक हा ज्ञानाच्या अथांग प्रवाहात स्वतः सज्ज होऊन सामील झाला. हा प्रवाह समाजातील पुढच्या अनेक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी. खरे पाहता संतांनी आणि समाजसुधारकांनी ज्ञानाची ही गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून खूप मोठं कार्य केलं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान समाजसुधारकांमुळे ज्ञानाची हीच गंगा घराघरापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या सर्व समाजसुधारकांनी केलेलं हे कार्य खरंच अतुलनीय आहे.
संतांनीसुद्धा आपल्या लिखाणातून विशेषत: अभंग, ओव्या, भारुडांतून खूप मोठी समाजजागृती करून ज्ञानदीप सातत्याने तेवत ठेवून सुदृढ समाज घडविण्याचं कार्य केलं. या सर्व संत महात्म्यांच्या व थोर पुरुषांच्या अमूल्य योगदानातून समाज जागृत झाला आणि शैक्षणिक जागृती समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घडून आली. अनेक साहित्यिक, लेखक, विचारवंत मोठ्या प्रमाणात लेखन करू लागले. लिखाणाची एक नवी उर्मी या सर्व महापुरुषांच्या अजरामर कालाकृतींतून समाजातील नवलेखकांना सातत्याने मिळत गेली आणि खऱ्या अर्थाने सुदृढ समाजनिर्मितीची नीव रचल्या गेली. ज्ञानार्जनातूनच पुढे वाचनाचं आणि लेखनाचं कार्य सुरू झालं ते अजूनही असंच अविरत सुरू आहे. यामुळेच समाजात साहित्यिक आणि प्रज्ञावंतांची एक सशक्त पिढी निर्माण झाली. त्यांच्याच लेखणीने समाजात सकस आणि सशक्त समाजनिर्मितीची बिजे रोवली गेली.
साहित्यातून व लेखणीतून खरी समाजनिर्मिती, जागृती घडून येण्यासाठी आज खरी गरज आहे ती दर्जेदार, कसदार आणि समाजोपयोगी लिखाणाची. लेखन हे फक्त लेखन नसावं तर त्यातून नवनिर्मिती आणि जागृती होणे अपेक्षित असते. आजघडीला समाजाला अशाच चांगल्या लेखनाची आणि लेखकांची आवश्यकता आहे. अनेक ज्वलंत विषय समस्या आपल्या समोर “आ’ वासून उभ्या आहेत. गरज आहे ती फक्त त्याला वाचा फोडण्याची आणि योग्य न्याय देण्याची. अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर लेखन करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून नव्याने समाजातील विविध आधुनिक समस्यांवर समाज जागृती करत काहीतरी नवनिर्मिती करण्यासाठी समाजाच्या हितासाठी लिहिण्याची नितांत गरज आहे, कारण आता लेखणी शिवाय खरंच पर्याय नाही.
– विशाल कन्हेरकर