इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, संशोधकांनी 22 रक्त नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यापैकी 17 नमुन्यांमध्ये मायक्रोप्लॅस्टिक असल्याचे आढळले. त्यापैकी निम्म्या नमुन्यांमध्ये पीईटी (पॉलिथिलीन टेरेफ्थालेट) आढळले असून, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
“द न्यूयॉर्क टाइम्स” या अमेरिकी वृत्तपत्राने 2017 मध्येच एक वृत्तांत प्रसिद्ध केला होता. “मानवी पोट हा मायक्रोप्लॅस्टिकचा समुद्र बनला आहे’ असे या वृत्तांताचे शीर्षक होते. आता मानवी रक्तातच मायक्रोप्लॅस्टिक सापडल्याने सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा प्लॅस्टिकच्या समस्येकडे वळले आहे. नेदरलॅंडच्या संशोधकांच्या गटाने नुकत्याच केलेल्या चाचणीत मानवी रक्तात मायक्रोप्लॅस्टिक प्रथमच आढळून आले. त्यामुळे जगभरातील संशोधक चिंतेत आहेत. मायक्रोप्लॅस्टिक्स हे प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण असतात. त्यांच्या व्यास 0.2 इंच किंवा 5 मिलीमीटरपेक्षा कमी असतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, संशोधकांनी 22 रक्त नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यापैकी 17 नमुन्यांमध्ये मायक्रोप्लॅस्टिक असल्याचे आढळले. त्यापैकी निम्म्या नमुन्यांमध्ये पीईटी (पॉलिथिलीन टेरेफ्थालेट) आढळले असून, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये 36 टक्के पॉलिस्टिरीन वापरले जाते आणि पॅकेजिंग फिल्म्स तसेच बॅगमध्ये 23 टक्के पॉलिथिलीन वापरले जाते. वास्तविक, प्लॅस्टिक हे एक रसायन आहे आणि त्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो. तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. प्लॅस्टिक ही एक विलंबाने विघटन पावणारी आणि नॉन-बायोडिग्रेडेबल सामग्री आहे. विलंबाने विघटन पावणारी याचा अर्थ त्याचे विघटन होण्यास बराच कालावधी लागतो आणि नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे ते कधीच संपत नाही. विलंबित बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकचे विघटन होण्यासाठी 300 ते 1200 वर्षे लागतात आपण फेकलेले प्लॅस्टिक पुढच्या पाच पिढ्यांना मारक ठरत राहील आणि त्यानंतरही ते नष्ट होणार नाही. जर ते नॉन बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक असेल तर ते सर्वत्र पसरते. ते मातीत मिसळते आणि तिथे त्याचे लहान लहान तुकडे होतात.
प्लॅस्टिक जर कुठेतरी जाळले तर त्यातील विषारी घटक हवेत मिसळतात. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये अनेकदा प्लॅस्टिक जळत असल्याचे आपल्याला दिसते. हे जळालेले प्लॅस्टिक पाण्याच्या प्रवाहाबरोबर नद्या आणि समुद्रात जाते. मासे आणि अन्य जलचरांच्या पोटात ते जाते. जेव्हा माणसांकडून असे मासे खाल्ले जातात, तेव्हा तेच प्लॅस्टिक माणसांच्या शरीरातही पोहोचते. गाईच्या पोटात अशाच प्रकारे प्लॅस्टिकचे अंश जातात. ते दुधात येत नाहीत; पण प्लॅस्टिकचे रसायन मात्र दुधात नक्कीच येते. बीपीए आणि थॅलेट्स ही प्लॅस्टिकमधील दोन रसायने मानवी शरीरासाठी घातक आहेत. प्लॅस्टिकचा वापर आणि अशा रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे अनेक प्रकारचे आजार आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. वंध्यत्व दूर करणे आणि कृत्रिम प्रजननासाठी आपल्या आसपास अनेक क्लिनिक उघडली जात आहेत, हे आपण पाहतोच.
प्लॅस्टिकमधील रसायनांमुळे महिलांमध्ये थायरॉइडची समस्या निर्माण होते. आज भारतातील चारपैकी एक महिला थायरॉइडच्या गोळ्या घेत आहे. जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ जीवघेण्या प्लॅस्टिकच्या संपर्कात येत असेल तर त्या व्यक्तीला कर्करोगही होऊ शकतो. दुसरी समस्या म्हणजे, मुलींमध्ये मासिक पाळी लवकर सुरू होणे. पूर्वी मासिक पाळी वयाच्या 12 व्या किंवा 13 व्या वर्षी सुरू होत असे. प्लॅस्टिकमुळे स्त्री संप्रेरकांची वाढ होते, त्यामुळे आता नऊ वर्षांच्या मुलींमध्येही हे चक्र सुरू होत आहे. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. समजा तुम्ही प्लॅस्टिकची एखादी वस्तू फेकून दिली आणि तुमच्यासारख्याच एक किंवा दोन अब्ज लोकांनी तसेच केले. हे प्लॅस्टिक मातीत जाऊन पडेल. पावसाचे जे पाणी मातीत मुरून भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करीत होते, ते आता प्लॅस्टिकमुळे वरच राहते. त्यामुळेच पूर येतात. तसेच भूजलाचा उपसाही वाढत असल्यामुळे त्याची पातळी सातत्याने खाली जात आहे.
अशा प्रकारे आपण हवा, माती, पाणी याबरोबरच मासे आणि अन्य प्राण्यांनाही विषारी बनविले आहे. आपल्या कर्माची फळे आपल्यालाच भोगावी लागत आहेत. प्लॅस्टिकचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाने सांगितले होते की, ही वस्तू कुजणार नाही आणि जळणारही नाही. त्याने चांगुलपणाने त्याचे सांगण्याचे काम केले होते; परंतु एके दिवशी प्लॅस्टिक मानवजातीची एवढी मोठी हानी करेल याचा अंदाज त्यानेही लावला नसेल. आज जर आपण प्लॅस्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली तरी त्याचे परिणाम दिसायला वीस वर्षांपेक्षा जास्त काळ लागू शकतो. जेव्हा प्लॅस्टिक नव्हते तेव्हा जीवन नव्हते का? असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.
ते नष्ट करण्याविषयी विचार करावाच लागेल. हे प्लॅस्टिक आपल्याला गरीब बनवीत आहे. आरोग्य समस्या आणि त्यावरील उपचारांचा खर्चही विचारात घेतला पाहिजे. छोटी प्लेट आणि चमचा सोबत ठेवला तर प्लॅस्टिकच्या थाळीची आणि चमच्याची गरजच भासणार नाही. वैयक्तिक पातळीवर आपल्याला आपल्या गरजांमधून प्लॅस्टिक हद्दपार करावे लागणार आहे. आपण प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी तांबे, स्टील आदी धातूंच्या बाटल्या वापरू शकतो.
अन्न गरम करण्यासाठी प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर करू नये. बाजारातून वस्तू आणायच्या असतील तर कापडी पिशव्या वापरा. सामुदायिक स्तरावर, कार्यालयांमध्ये स्वतःचे फ्लास्क आणि ग्लास वापरणे शक्य होईल. सरकारी पातळीवर प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घातली जायला हवी. त्यामुळे रोजगारावर परिणाम होईल, असे मुद्दे काढून विनाकारण वाद घालू नयेत. रुग्णालये आणि आरोग्यावरील वाढता बोजा दूर करण्याला प्राधान्य हवे. एकदा सवय झाली की सगळे काही ठीक होईल. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि सहभागाने आपण प्लॅस्टिकच्या समस्येतून मुक्त होऊ शकतो.
– डॉ. अंशुमन कुमार