संशोधनासाठी भटकंती करताना अनेक प्रकारचे अनुभव आले. काही मनात कायमचे ठाणे मांडून बसले. वाघोलीजवळच्या गावात काम करताना एक ताई भेटली.
तिला विचारले, “ताई तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कोणता?’ मला साधारणपणे अपेक्षा होती की, लग्न झालं तो क्षण किंवा आई झाले तो क्षण आवडीचा, असं उत्तर मिळेल. पण माझा अंदाज साफ चुकला. त्यांनी उत्तर दिलं, “मी पहिल्यांदा सही केली तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण.’
त्या बचतगटात जात होत्या. पण लिहिता-वाचता येत नसल्याने अध्यक्ष, सचिव अशी पदे मिळत नव्हती. त्या स्वतःच्या मुलाकडून लिहायला-वाचायला शिकल्या, का तर बसस्टॉपवर लहान मुलांना बस नंबर विचारायची लाज वाटते म्हणून. मुलाकडूनच त्या सही करायलाही शिकल्या.
काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करायची म्हणून सासऱ्यांबरोबर बॅंकेत गेल्या होत्या. बॅंक नुकतीच सुरू झाली होती. त्यामुळे गर्दी होती. त्या गर्दीत बॅंक ऑफिसर त्यांना म्हणाले, “बाई इथे अंगठा लावा.’ त्यावर त्यांनी ठणकावून सांगितले की, “अंगठा कशाला, मी सही करणार आहे’. असं त्यांनी बॅंकेत जमलेल्या सगळ्या लोकांच्या देखत सांगितले.
तो माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण. बसचे नंबर मला वाचता येऊ लागले, तेव्हा फार भारी वाटलं. हे आतून वाटणं महत्त्वाचे आहे. सबल व्हावे असे वाटावे लागते. अशाच एका भटकंतीत एक भेटली. लग्न होऊन काही वर्षे गेली पण हिला मूलबाळ झालं नाही म्हणून तिच्या नवऱ्याचे दुसरं लग्न लावून दिलं. या लग्नानंतर त्याला मुलगी झाली.
दुसरी बायको वयाने लहान होती म्हणून मी विचारले, “हिच्या आईवडिलांनी काहीच कशी चौकशी कशी केली नाही.’ तेव्हा ती मला म्हणाली, “ताई, तिच्या आईवडिलांची काहीतरी मजबुरी असेल म्हणून करावं लागलं, पण तिच्यामुळे मला पोरगी झाली. आईपणाचं किती सुख आणि महत्त्व असतं.’ प्रत्येक भटकंती म्हणजे नवे लोक, नवा अनुभव.
– डॉ. नीलम ताटके