खरोखरीच निसर्गासारखा मोठा शिक्षक दुसरा कुणी नसेल. विख्यात इंग्रजी कवी वर्डस्वर्थ यानं म्हटलं आहे- कम फोर्थ इंटु द लाइट ऑफ थिंग्ज, लेट नेचर बी युअर टीचर. म्हणजे सगळ्या गोष्टी कशा घडतात ते समजून घ्या, निसर्ग हाच तुमचा शिक्षक होऊ दे. निसर्ग हा तर आपल्यासाठी शिक्षक आहेच. परंतु याच निसर्गाचा काहीसा दुर्लक्षिलेला भाग म्हणजे कीटकवर्ग. या किटकांपासूनही मानवानं खूप शिकण्यासारखं आहे.
एका संस्कृत श्लोकात म्हटलं आहे-
योजनानां सहस्रं तु शनैर्गच्छेत् पिपीलिका ।
आगच्छन् वैनतेयोपि पदमेकं न गच्छति ।।
याचा अर्थ मुंगी निष्ठेनं आणि चिकाटीनं हजारो योजनं लांब जाऊ शकते परंतु इच्छा नसेल तर गरुड एक पाऊलही पुढे सरकत नाही. मुंगी किती दृढनिश्चयी असते ते या श्लोकात सांगितलं आहे. मला तर असं वाटतं की कुठल्याही कीटकाच्या व्यवहाराकडे पाहिलं तर त्यातून घेण्यासारखं नक्कीच काहीतरी मिळेल.
मुंगीचाच विचार केला तर त्यांची समाजव्यवस्था-होय समाजच, कारण मुंगी हा एक सामाजिक कीटक आहे-अगदी आश्चर्यकारक आहे. त्यांच्या समाजाच्या प्रत्येक श्रेणीला नेमून दिलेलं काम त्यातील घटक विनातक्रार, विनाअडथळा पार पाडीत असतात. मुंग्यांच्या समाजात वर्गव्यवस्था जरूर आहे परंतु घटकांची निष्ठा ही अभेद्य असते. जनुकांमार्फत देण्यात आलेले काम त्या समंजसपणे करत असतात. या कामांमध्ये अन्नाची साठवण, शत्रूंशी मुकाबला, कीटकपालन, वारूळ-बांधणी अशा अनेक गुंतागुंतीच्या कामांचा अंतर्भाव होतो.
मधमाशांबद्दलही असंच म्हणता येईल. त्यांचा समूहही अतिशय सुसंघटित असतो. या दोन्ही कीटकांकडून योजना, त्या पार पाडण्यासाठी केलेले अविश्रांत श्रम हे गुण घेण्यासारखे आहेत. या दोन्ही कीटकवर्गातील उच्च-नीच (म्हणजे राणी, श्रमिक इ.) असे वर्ग कदाचित काही लोकांना मान्य होण्यासारखे नसतीलही. परंतु जोवर मानवजातीत भिन्नव्यक्तित्ववाद आणि स्पर्धा आहेत तोवर कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात वर्गभेद (वर्णभेद नव्हे) हा राहणारच. आल्डस हक्सली या नोबेल पुरस्कार विजेत्या लेखकाच्या “ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या कादंबरीत भविष्यकालीन समाजरचनेत अल्फा, बीटा, गॅमा असे कार्यस्वरूप वर्ग दाखवण्यात आले आहेत. तेव्हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे मानवी समाजात वर्गभेद राहणारच हे मान्य केल्यास कीटकांच्या समाजव्यवस्थेचं महत्त्व उमगून येईल.
निसर्गानं प्रत्येक प्रजातीला विशिष्ट गुण दिलेले आहेत. काहींमधील गुणधर्म तर मानवाला कॉपी करणं अशक्य आहे. कोळी ज्या वेगानं अचूक आणि रेखीव अशा भौमितिक रचनेतील जाळं विणतो त्याची मानवी आवृत्ती अशक्यच आहे. याशिवाय त्याच्या अतिसूक्ष्म अशा जाडीच्या धाग्यामध्ये जी विलक्षण शक्ती आहे त्यानं शास्त्रज्ञांना चकित केलं आहे. असा धागा जर कृत्रिम रीत्या तयार करता आला तर वजनाला हलकी परंतु न तुटणाऱ्या धाग्यांची वस्रे बनवता येतीलच पण संरक्षण क्षेत्रात उपयुक्त होतील अशी साधनं (उदा. हवाई छत्री) बनवता येतील. या ठिकाणी कोळी हा प्राणी कीटकवर्गात मोडत नाही (तो अष्टपाद आहे) याची मला जाणीव आहे. तरीही हा कीटकसदृश प्राणीही अभ्यासास नक्कीच पात्र आहे.
झुरळांबद्दल तर असं बोललं जातं की महाप्रचंड अणुस्फोटामुळे जीवसृष्टीचा मोठ्या प्रमाणात नाश झाला तरी ही प्रजाती जिवंत राहील. झुरळांकडे तग धरून राहण्याची असामान्य शक्ती आहे. अनेक कीटकांच्या शरीरावरील अतिशय कठीण कवचसदृश आवरण हे चिटिन नामक बहुवारिकाच्या (पॉलिमर) साह्यानं बनलेलं असतं. हा पदार्थ जैवविघटनक्षम आणि कठीण असल्यानं याचाही शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत.
अर्थात सर्वात महत्त्वाचं काम अनेक कीटक करीत असतात ते म्हणजे परागीभवन. ते काम जर त्यांनी थांबवलं तर मानवजातीवर उपासमारीची पाळी येईल. रेशमासारखे अतिशय उपयुक्त धागे हेही कीटकांमुळेच मानवाला प्राप्त होतात. लाख तसेच अनेक प्रकारचे रंग आणि इतर रसायनंही कीटक उपलब्ध करून देतात. कीटक निसर्गसाखळीचा एक महत्त्वाचा दुवा आहेत, हेही विसरून चालणार नाही.