सरत्या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मनात कुठेतरी हुरहुर वाटते हो ना! निरोपाचा क्षण नेहमीच खरं तर वाईट असतो. शाळेचा निरोप समारंभ आठवतो ना! किती वाईट वाटायचं, डोळे सारखे गळायचे हो ना! नव्या घरात राहायला जाताना उत्साह असतो, पण मनात रुखरुख असते कारण जुन्या घराशी आपल्या असंख्य चांगल्या वाईट आठवणी असतात.
सुट्टीत बाहेरगावी जाऊन परत येतानाही वाईट वाटते. निरोपाचा वेळ येऊच नये असं वाटतं. मुलीला सासरी पाठवायचा क्षण आईवडिलांसाठी अत्यंत अवघड असतो. मुलीला लहानाचे मोठं करायचं, व्यक्तिमत्त्व घडवायचे आणि दुसऱ्यांकडे सुपूर्त करायचं.
सरतं वर्ष खूप काही शिकवून गेलं. आपल्याला स्वतःमध्ये बदल करायला हवा हे शिकवून गेलं. वर्ष काही असो पण कायमचं संपणार वाईट वाटत ना, कारण उरतात फक्त आठवणी ज्यावर आपण आपलं आयुष्य सुसह्य करत असतो. नोकरीत सामावून शेवटचा दिवस निवृत्तीचा, तेव्हा पाऊल जड होतं की उद्यापासून हे सगळं संपणार. दिवाळीतला भाऊबीजेचा दिवस, अनंत चतुर्दशी येऊच नये असं वाटतं.
कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला कायमचा निरोप द्यायची वेळ तर कधीच येऊ नये. कारण क्षण अतिशय दु:खाचा असतो. कॉलेजचे दिवस संपले की ते मनात रेंगाळत राहतात. खरंच सोनेरी दिवस पुन्हा कधीही न येणारे. मोरपंखी दिवस. नुसत्या आठवणी. वर्ष बदललं म्हणजे फक्त कॅलेंडर बदलत नाही त्याच्या बरोबर नव्या जबाबदाऱ्या येतात. आपण केलेले संकल्प पूर्ण करायच्या प्रयत्नांना सुरुवात होते.
शाळेचं वर्ष वेगळं, आर्थिक वर्ष वेगळं, कॅलेंडरचे वेगळं. वास्तविक स्वतःचा नव्याने शोध लागला तेही नवीन वर्ष असतं. आपण विशिष्ट यश संपादन केलं तर ते नवीन वर्ष असंही होऊ शकतं.
नवीन वर्षाचं स्वागत कवी कवितेतून करतो. चित्रकार आपल्या चित्रातून करतो. त्या चित्रातल्या रंगछटा चित्रकारांच्या मनातला आनंद, उत्साह, दु:ख दर्शवत असतात. कवितेतील शब्द कवीच्या भावना बोलून दाखवत असतात. सामान्य माणूस मात्र आमच्याकडे नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर नवीन बाकी तेच ते. इतकं चक्रात अडकल्यासारखं आयुष्य आहे.
एखाद्या ऐतिहासिक वास्तूचा निरोप घेताना वाईट वाटतं. कारण जेवढा काळ तिथे असतो तेव्हा तिथल्या इतिहासात आपण गुंग झालेले असतो किंबहुना त्यातच वावरत असतो. अहल्याबाईंचा रंगमहाल ही वास्तू अशीच भुरळ घालणारी आहे. ती आपल्या महाराष्ट्रातच आहे. तिथे वावरताना वाटतं या वास्तूने काय काय पाहिले असेल.या ठिकाणी काही काळ वावरता आलं हे भाग्य.
निसर्गरम्य स्थळ विशेषतः समुद्र किनाऱ्यावर तासन्तास बसायला आवडतं. इथून उठून नये असं वाटतं. दिवसातल्या वेगवेगळ्या क्षणी समुद्राचं रूप बघायला आवडतं. अगदी रात्रीच्या काळोखातसुद्धा बघायला आवडतं. मनात अनेक चित्रं उभी असतात.
निरोपाचं पत्र. परदेशात कायमचं स्थायिक होण्यासाठी जातानाचं अखेरचं पत्र. शहर कायमचे सोडून जाताना उपनगरात राहायला जाताना जुन्या ठिकाणाचा निरोप घ्यावासा वाटत नाही.
सर्वेक्षणासाठी तात्पुरते एखाद्या गावात गेलं तरी ऋणानुबंध जुळतात. तिथून पाय निघत नाही. कारण तिथले लोक मनापासून पाहुणचार, विचारपूस करतात. त्यांच्या मनात विलक्षण आपलेपणा असतो.
शिवाय काम करता करता कधी इथे गुंतलो ते कळत नाही. अगदी एखाद्या संस्थेत गेलं तरी तिथली मुलं, वृद्ध इतके जीव लावतात की, पाय निघत नाही. तिथेही निरोपाचं क्षण हुरहुर लावणारा असतो. कारण माणसं पुन्हा पुन्हा भेटावे असं त्यांना वाटतं. पण प्रत्येक वेळी ते शक्य असते असं नाही. चला नव्या वर्षाचे स्वागत उत्साहाने करू, सुरुवात गोड तर सारेच गोड.
– डॉ. नीलम ताटके