पुसेगाव – ज्यांना खडतर परिश्रम करायचे आहेत, त्यांनीच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा विचार करावा. प्रशासकीय सेवेत प्रत्येक पदावर प्रत्येकाला प्रभावक्षेत्र मिळते. शासकीय सेवेत काम करायला “स्काय इज द लिमिट’ असते. या माध्यमातून समाज घडविता आणि बदलता येतो. स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे बदललेल्या अभ्यासक्रमाची आणि परीक्षा पध्दतीची माहिती घेऊन स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जा, असे आवाहन पुणे विभागाचे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.
पुसेगाव पत्रकार संघाच्यावतीने आयोजित प्रकट मुलाखतीत दळवी बोलत होते. मुलाखतकार अजित चव्हाण यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना चंद्रकांत दळवी यांनी हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोर त्यांचा जीवनपट उलगला. स्पर्धा परीक्षा आणि बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी दळवी म्हणाले, “”आठ महिने काम करुन राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करुन आपल्या राज्यसेवा परीक्षांचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. पूर्व परीक्षेतील सिव्हिल सर्विसेस ऍप्टिट्यूड टेस्ट हा पेपर गुणवत्तेतून काढून क्वॉलिफायरमध्ये समाविष्ट केला आहे. मुख्य परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असायची ती आता वर्णनात्मक होणार आहे. भाषा विषय पूर्वी गुणवत्तेसाठी होते. ते आता क्वॉलिफायर करण्यात आले आहेत. वैकल्पिक विषयांनाही परवानगी देण्यात आली आहे. निबंधांचा 250 गुणांचा एक पेपर सुरु करण्यात आला आहे. हे बदल केल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससीतही यशस्वी होणार आहेत.”
दळवी म्हणाले, “”पाचवी ते दहावीची इतिहास, भूगोल, सायन्स ही पुस्तके जपून ठेवा. अवांतर वाचन सुरु ठेवा. अकरावी, बारावीत असताना स्पर्धा परीक्षांचा विचार करा. पदवीच्या पहिल्या वर्षापासून अधिक गांभीर्याने विचार करा. शेवटच्या वर्षी फॉर्म भरुन लगेच पहिली परीक्षा द्या. पुढील दोन वर्षे पोस्ट ग्रॅज्युएशन करताना स्पर्धा परीक्षांचा मन लावून अभ्यास करा. आता आठ हजार पदांसाठी परीक्षा होणार आहेत. त्यासाठी आधाशासारखे वाचन, लिखाण आणि उजळणी करा. दिवसांतून किमान आठ ते दहा तास अभ्यास करुन स्वतःच्या नोट्स काढा. लिखाणाची सवय वाढवा. वर्ग एक, दोन अधिकारी, पोलीस पाटील ते अगदी कोतवाल पदासाठीही स्पर्धा परीक्षा द्याव्या लागत आहेत. त्यामुळे योग्य नियोजन करुन अभ्यास करा. काय, कसे आणि किती लिहायचे ते आत्मसात करा. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करा. भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असल्याने इंग्रजीचे दडपण घेऊ नका. सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षा अभ्यासाचा बाऊ करु नका. ज्ञान सामर्थ्य आहे.
आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मुलाखतीला सामोरे जा. मुलाखत व्यक्तिमत्त्व चाचणी असते. त्यात बोलणे प्रभावी हवे. संभाषण कौशल्य चांगले पाहिजे. नजरेला नजर भिडवून उत्तरे द्या. विद्यार्थ्यांनी अष्टावधानी असले पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून काम करताना समाजासाठी हितकारक योजना राबवता येतात.” स्पर्धा परीक्षांसाठी खडतर परिश्रम लागतात. अपयश आलेच तर दुसरे पर्याय तयार ठेवा. खचून जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक पत्रकार संतोष साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन मोहनराव गुरव यांनी केले. संजय जाधव यांनी आभार मानले. अध्यक्ष ऋषिकेश पवार, उपाध्यक्ष प्रकाश राजेघाटगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रदीप विधाते, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष जाधव, शिक्षक बॅंकेचे चेअरमन नवनाथ जाधव, विश्वस्त सचिन देशमुख, संतोष वाघ, सरपंच विजय मसणे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, पत्रकार संघाचे सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
सोशल मीडियाचा अतिरेक टाळा
सोशल मीडियाचा वापर मर्यादित आणि कामापुरताच करा. फक्त अभ्यासासाठीच मोबाइल वापरा. परीक्षांचा अभ्यास करताना मोबाइल बंदच ठेवा. सोशल मीडियाचा अतिरेक टाळा. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. ते अनअव्हायडेबल इव्हिल्स आहेत, असेही दळवी यांनी सांगितले.